
‘सुकन्या समृद्धी योजनेसाठी टपाल विभागाची विशेष मोहीम
पिरंगुट / बारामती, ता. ७ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ९ व १० फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारतात ७.५० लाख सुकन्या समृद्धी खाते सुरु करण्यासाठी विशेष मोहीम टपाल विभागामार्फत राबविली जाणार आहे. त्यामुळे पालकांनी नजीकच्या टपाल कार्यालयामध्ये जाऊन आपल्या मुलीचे सुकन्या समृद्धी खाते उघडावे व त्यांचे भविष्य सुरक्षित करावे, असे आवाहन टपाल विभागाचे पुणे ग्रामीण पश्चिम उपविभागाचे सहायक अधीक्षक गणेश वडूरकर यांनी केले.
सुकन्या समृद्धी योजनेची ठळक वैशिष्ट्ये
• दहा वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या एका कुटुंबातील दोन मुलींची नावे खाते उघडता येते.
• कमीत कमी रुपये २५० व जास्तीत जास्त १.५ लाख रुपये रकमेची एका आर्थिक वर्षात गुंतवणूक करता येते.
• मुदत २१ वर्ष असली तरी भरणा मात्र खाते उघडल्यापासून पंधरा वर्षे करायचा आहे.
• मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ५० टक्के रक्कम काढता येते.
• गुंतवलेल्या रकमेवर आयकर कलम ८० सी अंतर्गत सूट.
• इंडिया पोस्ट पेमेंट बँकेद्वारे ऑनलाइन पैसे भरण्याची सोय.
• व्याजदर ७.६ टक्के (प्रचलित)
• प्रचलित व्याज दरानुसार प्रती महिना रुपये १००० जमा केल्यास १५ वर्षांमध्ये १ लाख ८० हजार रुपये जमा होऊन २१ वर्षानंतर अंदाजे रक्कम रुपये ५ लाख १० हजार ३७७ रुपये रक्कम मिळते.