
कोरेगाव मूळच्या सरपंचांवर अविश्वास ठराव दाखल
उरुळी कांचन, ता. १८ : कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या १३ पैकी १० सदस्यांनी येथील सरपंच विठ्ठल राजाराम शितोळे यांच्या विरोधात बुधवारी (ता. १५) अविश्वास ठराव दाखल केला.
याबाबत उपसरपंच वैशाली अमित सावंत, ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब यशवंत बोधे, भानुदास खंडेराव जेधे, मंगेश अशोक कानकाटे, सचिन गुलाब निकाळजे, लीलावती बापूसाहेब बोधे, अश्विनी चिंतामणी कड, राधिका संतोष काकडे, मंगल जगन्नाथ पवार, पल्लवी रमेश नाझिरकर या १० सदस्यांनी तहसीलदार किरण सुरवसे यांना पत्र दिले आहे.
बहुमताने घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणे, ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता ग्रामपंचायतीचे कामकाज करणे, सदस्यांना अपमानास्पद वागणूक देणे, मनमानी पद्धतीने ग्रामपंचायतीचे कामकाज करणे, अशा लेखी स्वरूपातील तक्रारी अविश्वास ठरावात या सदस्यांनी नमूद केल्या आहेत.
दरम्यान, या अविश्वास ठरावावर हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांनी मंगळवारी (ता. २१) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्यांसाठी विशेष सभा आयोजित केली आहे. त्यात या ठरावावर निर्णय होणार आहे.