
इंदापुरात शेतकरी, व्यवसायिकांना फटका
वालचंदनगर, ता.४ : महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका ग्रामीण भागातील शेतकरी, व्यवसायिकांना बसला. शेतीचे कामे खोळंबली तर व्यावायिकांचेही मोठे नुकसान झाले. तसेच विद्यार्थ्यांचे ही शैक्षणिक नुकसान झाले.
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील वालचंदनगर, कळंब, निमसाखर, निरवांगी परिसरामध्ये वीज गेल्यामुळे शेतकऱ्यांसह व्यवसायिकांच्या कामांचा खेळखंडोबा झाला.
महावितरणचे कर्मचारी संपावरती असल्याने दुरुस्तीचे काम झाले नसल्यामुळे सर्वांनाच मनस्ताप सहन करावा लागला. कळंबमधील फडतरे नॉलेज सिटीमध्ये वीज नसल्यामुळे इंग्लिश मीडियम, पॉलिटेक्निक, फॉर्मासीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वीज नसल्याचा फटका बसला असल्याची माहिती प्रार्चाय नागेश ठोंबरे यांनी दिली. तसेच निमसाखर, लासुर्णे परिसरामध्ये सकाळपासून विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देताना अडचण निर्माण झाली होती. .निमसाखर मधील शेतकरी नंदकुमार लक्ष्मण रणवरे यांनी सांगितले की, आज उसाची लागण करायची होती. मात्र दोन-तीन वेळा लाइट ट्रीप झाल्यामुळे लागण करण्याचे काम रखडले.
वालचंदनगरमधील सलून व्यावसायिक राजू धारे यांनाही संपाचा फटका बसला.
गव्हाचे पिकाला खते टाकून पाणी देण्याचे नियोजन होते. सकाळपासून दुपारपर्यंत खत टाकण्याचे काम सुरु होते. मात्र अचानक दुपारी लाइट गेल्यामुळे पाणी देण्याचे काम रखडले आहे.
- विश्वजित तावरे, शेतकरी