पेपरच्या तुटवड्यामुळे रद्दीलाही मोलाचा भाव! 

दोन वर्षांत रद्दीचे दर झाले ९ रुपयांवरून २४ रुपये प्रतिकिलो

पेपरच्या तुटवड्यामुळे रद्दीलाही मोलाचा भाव! दोन वर्षांत रद्दीचे दर झाले ९ रुपयांवरून २४ रुपये प्रतिकिलो

पुणे, ता. २ ः प्लास्टिक बंदी, पेपरच्या आयातीवर झालेला परिणाम, पॅकेजिंगसाठी वाढलेली मागणी आदी विविध कारणांमुळे रद्दीचे भाव पहिल्यांदाच उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. एरवी १२-१३ रुपये प्रतिकिलोचे विकत घेतली जाणारी रद्दी आता २३-२४ रुपयांवर पोचली आहे. तसेच मागणीच्या तुलनेत सुमारे ५० टक्क्यांची घट असल्यामुळे रद्दीचे भाव वाढल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

पेपरची आयात यापूर्वी चीनमधून होत. परंतु, कोरोनाच्या काळात त्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला. तसेच देशातील आणि अन्य देशांतील पेपरनिर्मितीच्या उत्पादन खर्चातही मनुष्यबळ अपुरे असल्यामुळे वाढ झाली. त्यातच प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी काही प्रमाणात काटेकोर पद्धतीने सुरू झाली. त्यामुळे कागदी पिशव्या तसेच कागदी प्लेट, ग्लास, वाट्या आदींचीही मागणी वाढली. त्यालाही वृत्तपत्रांची रद्दी लागते. तसेच पेपरचा तुटवडा झाल्यामुळे वृत्तपत्रांच्या निर्मितीवरही काहीसा परिणाम झाला. वृत्तपत्राच्या रद्दीचा एरवी मोठ्या प्रमाणावर फेरवापर (रिसायकल) होत. त्यातून नवा पेपर आणि पॅकेजिंगसाठी मटेरिअल तयार होत असे. परंतु, त्याची वाढती मागणी असूनही रद्दी कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे भाव वाढत असल्याचे निरीक्षण या क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदविले. केवळ पुण्यातच नव्हे तर, विविध जिल्ह्यांतही रद्दीचे भाव आता २३-२४ रुपये प्रतिकिलोवर पोचले आहेत.

याबाबत बी. जे. भंडारी पेपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विजय भंडारी म्हणाले, ‘‘पूर्वी चीनमधून पेपर येत. परंतु, तो आता बंद झाला आहे. त्यामुळे आपल्या देशातून चीन, युरोप आणि आखाती देशांत पेपर निर्यात होत आहे. त्यातच वृत्तपत्रांच्या कागदाचा तुटवडा निर्माण झाला आहे. देशातील उद्योगांतही त्यांच्या रद्दीचा वापर होतो. परंतु, त्याचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात ४०-५० टक्क्यांपर्यंत फरक पडला आहे. परिणामी रद्दीचे भाव वाढत आहेत.’’

वृत्तपत्राच्या रद्दीला मोठी मागणी असते. परंतु, ही रद्दी उपलब्ध होण्याचे प्रमाण घटले आहे. त्यातच कोरोनामुळे कागदी प्लेट, ग्लास आदींची मागणी वाढली आहे. त्यासाठीही रद्दी लागते. परंतु, पुरवठाच कमी असल्यामुळे रद्दी घटली आहे. परिणामी, भाव वाढले आहेत.
- तिमिर संघवी, आदिनाथ ट्रेडर्स

दोन वर्षांत दर झाले तिप्पट!
जेआरबी रद्दी केंद्राचे संचालक चेतन भट्टड म्हणाले, ‘‘कोरोनापूर्वी पुण्यात वृत्तपत्राची रोज सुमारे ३०० टन रद्दी उपलब्ध होत. ते प्रमाण आता १०० टनावर आले आहे. पेपरचा पुरवठाच एकंदरीत कमी झाला आहे. त्यामुळे कोरोना पूर्वी ८-९ रुपये प्रतिकिलो रद्दीचे दर गेल्यावर्षी मार्चमध्ये १३-१४ रुपयांवर पोचले. ऑगस्टमध्ये १५-१६ रुपये प्रतिकिलो झाले. आता पहिल्यांदाच २३- २४ रुपये प्रतिकिलोवर दर पोचले आहेत.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com