Panchnama
PanchnamaSakal

कशाला गेलो सोडून पुणे, कोकणात तर सगळंच उणे!

बऱ्याच वर्षांनी अनिरुद्ध कोकणातील आपल्या मूळगावी गेला होता. तब्बल १५ दिवस तिथे मुक्काम केल्यानंतर तो परत पुण्याला आला.
Summary

बऱ्याच वर्षांनी अनिरुद्ध कोकणातील आपल्या मूळगावी गेला होता. तब्बल १५ दिवस तिथे मुक्काम केल्यानंतर तो परत पुण्याला आला.

बऱ्याच वर्षांनी अनिरुद्ध कोकणातील आपल्या मूळगावी गेला होता. तब्बल १५ दिवस तिथे मुक्काम केल्यानंतर तो परत पुण्याला आला. मात्र, त्याला ‘कसंतरीच’ होऊ लागल्याने प्राजक्ताने त्याला डॉ. माने यांना दाखवले. डॉक्टरांनी अनिरुद्धचा जीवनक्रम तपासला व काही रक्ताच्या चाचण्या करायला सांगितल्या.

दुसऱ्या दिवशी रिपोर्ट पाहिल्यानंतर डॉ. माने फारच काळजीत पडले. ते म्हणाले, ‘रुग्णाला ‘चेंज एअर फोलिओ’ हा गंभीर आजार झाला आहे. सलग १५ दिवस कोकणातील स्वच्छ व प्रदूषणविरहित हवा रक्तात गेल्याचा हा परिणाम आहे. तसेच कोकणातील अनेकजण त्याच्याशी आत्मीयतेने व प्रेमळपणे बोलल्याने ‘रिस्पेक्टगुणिया’चा व्हायरसही त्याच्या रक्तात दिसतोय. कोकणातील गावी असल्याने सलग १५ दिवसांत एकदाही वाहतूककोंडीत सापडून त्याचा जीव गुदमरला नाही. त्यामुळे ‘नॉन ट्रॅफिक फोबिया’ही झाला आहे.

पुण्यातील रस्त्यावरील खड्ड्यांतून प्रवास करताना हाडे खिळखिळी होण्याचा त्याचा रोजचा अनुभव आहे. मात्र, गेल्या १५ दिवसांत एकदाही त्याला हा अनुभव न मिळाल्याने ‘बोनविकनेस’चाही आजार जडला आहे. रुग्णाला पुण्यात हिंडताना ठिकठिकाणच्या कचराकुंड्यांतील दुर्गंधीची सवय झाली आहे. कोकणातील गावात असा वास त्याला कोठेही मिळाला नसल्याने त्याची घाणेंद्रिये नीट काम करेनाशी झाली आहेत, त्यावरही उपचार केले पाहिजेत.

वाहतूक पोलिस, पीएमटी कंडक्टर, महावितरणचे कर्मचारी यांच्याबरोबरच वाहतूक कोंडीत सापडल्यावर समोरच्या वाहनचालकाशी हुज्जत घालण्याची संधी रुग्णाला मिळाली नाही. त्यामुळे ‘हुज्जत में इज्जत’ हा आजार बळावला आहे.

‘डॉ. माने यांचे बोलणं ऐकून प्राजक्ता घाबरली व चिडून म्हणाली. ‘‘तरी मी सांगत होते, गावाला जाऊ नका म्हणून. पण माझ्या मेलीचं ऐकतंय कोण? आता हे निस्तरायचं कोणी?’ केबिनमध्येच ती रडायला लागली.

तिला शांत करीत डॉक्टर म्हणाले, ‘‘पथ्यपाणी पाळलं व काही उपाययोजना केल्यास रुग्णाची तब्येत पूर्वीसारखी चांगली ठणठणीत होऊ शकते.’ त्यावर प्राजक्ताचा चेहरा आनंदाने उजाळला.

डॉक्टर म्हणाले, ‘रुग्णाला ‘नॉन ट्रॅफिक फोबिया’तून बाहेर काढण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूककोंडीत रोज सकाळी अकरा व सायंकाळी पाचच्या सुमारास सोडत जा. तिथे दोन-अडीच तास कोंडीत सापडल्यावर प्रकृतीत नक्की सुधारणा होईल. कोकणातील अनेकजण रुग्णाशी आत्मीयतेने बोलल्याने ‘रिस्पेक्टगुणिया’ झाला आहे. रुग्णाला अशा वागणुकीची सवय नसल्याने आजार बळावला आहे. यावर मात करण्यासाठी रुग्णाला आठवड्यातून तीन दिवस बॅंकेत पाठवत जा. तेथे अपमानास्पद वागणूक मिळाल्यास तब्येत सुधारेल.

प्रदूषणविरहित स्वच्छ हवेची सवय नसल्याने ‘चेंज एअरफोलिया’ झाला आहे. त्यासाठी रुग्णाला दिवसातून दोन तास शिवाजीनगर व स्वारगेटच्या चौकात उभे करा. वाहनांचा धूर नाका-तोंडात गेल्यास आठवडाभरात रुग्णाची तब्येत ठणठणीत होईल. शिवाय ‘बोनविकनेस’वर मात करण्यासाठी पुण्यातील खड्ड्यांतील रस्त्यावरून त्यांना रोज दीड-दोन तास प्रवास करू द्या. कचराकुंडी शेजारून असा प्रवास केल्यास त्यांची घाणेंद्रियेही सुधारतील. वरील ठिकाणी रुग्णाला सातत्याने पाठविल्यास ‘हुज्जत में इज्जत’ हा आजारही लवकर बरा होईल.’’ सध्या अनिरुद्ध पुन्हा १५ दिवसांच्या रजेवर असून, डॉक्टरांनी सांगितलेली पथ्येपाणी व उपाययोजनांची अंमलबजावणी करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com