Education
EducationSakal

शिक्षणाची करू नका ‘शाळा’

सध्या कोरोनाची तिसरी लाट सुरु आहे. आधीच्या दोन्ही लाटांपेक्षा तुलनेने ही सौम्य असल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे, मात्र या संसगार्मुळेही विविध क्षेत्राचे नुकसान होतच आहे.
Summary

सध्या कोरोनाची तिसरी लाट सुरु आहे. आधीच्या दोन्ही लाटांपेक्षा तुलनेने ही सौम्य असल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे, मात्र या संसगार्मुळेही विविध क्षेत्राचे नुकसान होतच आहे.

सध्या कोरोनाची तिसरी लाट सुरु आहे. आधीच्या दोन्ही लाटांपेक्षा तुलनेने ही सौम्य असल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे, मात्र या संसगार्मुळेही विविध क्षेत्राचे नुकसान होतच आहे. आरोग्य तसेच औद्योगीक क्षेत्रातील नुकसानीचा अंदाज आकडेवारीवरून मोजता येतो. पण यामुळे होत असलेल्या शैक्षणिक क्षेत्राच्या हानीची मोजदाद केवळ अशक्य आहे. शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे कधी बंद-कधी चालू हा खेळ गेले दोन वर्षे सुरु असून अजूनही तो काही केल्या थांबायचे नाव घेण्याची चिन्हे नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे कधीही भरून न येणार नुकसान होत आहे. दुर्दैवाने याचा सर्वंकष विचार होताना दिसत नाही ही खरी खंत आहे.

महाविद्यालये तत्काळ सुरू करा

जिल्ह्यातील शाळा आता आणखी आठवडाभर बंद राहणार आहेत तर महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचे आधीच जाहीर झाले आहे. सारे काही चालू केवळ शाळा-महाविद्यालये सरसकट बंद अशी विचित्र परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण होत आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे लहान मुलांना शाळेत पाठवणे धोक्याचे आहे असे थोड्या वेळापुरते मान्य केले तरी नववीपासून पुढच्या शाळा आणि त्यातही महाविद्यालये तातडीने सुरु करण्यास काही हरकत नाही अशी सध्याची परिस्थिती आहे. महाविद्यालयांची तर बाबच वेगळी आहे. कारण आता १५ ते १८ वयोगटासाठीचे लसीकरण कधीच सुरु झाले आहे. पुण्याचा विचार करता शहरात आतापर्यंत या वयोगटातील ८० हजार मुलांनी लशीचा पहिला डोस एव्हाना घेतलाही आहे. महाविद्यालये सुरु झाली तर या मुलांचे तेथेच शंभर टक्के लसीकरण वेगाने होण्याचा मार्ग खुला होणार आहे. तसेच ऑमिक्रॉनचा विषाणू पूर्वीसारखा घातक नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. असा परिस्थितीत शिक्षण क्षेत्राची कवाडे टप्प्याटप्प्याने सुरु कशी करता येतील याचा प्राधान्याने विचार केला पाहिजे. तो होताना दिसत नाही. सरसकट सर्वांसाठी सारे बंद हा अंतिम उपाय नाही.

Education
पुणे : अमृततुल्यची पाणीपट्टी माफ करण्याची मागणी

सर्वांगीण विकासापासून मुले वंचित

शाळा, महाविद्यालयांत मुलांना केवळ शैक्षणिक विषयांचेच ज्ञान मिळत नसते. तर त्यांचा सर्वांगीण विकास येथेच घडत असतो. तेथे मुलांची मानसिक, सामाजिक, भावनिक जडणघडण होत असते. दुर्दैवाने सध्या मुले या साऱ्या गोष्टींना मुकत आहेत. ऑनलाइन शिक्षणातून मुलांना किती ज्ञान मिळते हा आता संशोधनाचा विषय बनला आहे. यामुळे दहावी पास झालेल्या जवळपास बारा ते पंधरा लाख मुलांवर महाविद्यालयाचे तोंड न पाहताच बारावीची परिक्षा देण्याची वेळ आली आहे. तीच गत बारावी उत्तीर्ण झालेल्यांची आहे. विज्ञान, इंजिनिअरिंग, मेडिकल या विद्याशाखेच्या मुलांना प्रयोगशाळेतील शिक्षण अनिवार्य असते. सर्वांना हे सारे मान्य आहे पण कळते पण वळत नाही अशी सध्या स्थिती झाली आहे. यातून विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लागत आहे.

सर्वांत शेवटी काय बंद करावे तर शाळा-महाविद्यालये असे जागतिक आरोग्य संघटनेने मत आहे. पण नेमके याच्या उलट आपल्याकडे घडत आहे. अशावेळी किमान नववीच्या पुढील वर्ग तसेच महाविद्यालये टप्प्याटप्प्याने कशी सुरु करता येतील या दिशेने ठोस पावले टाकली पाहिजेत. त्यासाठीच्या उपाययोजनांवर तत्काळ भर दिला पाहिजे. उदाहरणार्थ शाळांची वेळ वाढविणे, स्वतंत्र मेडिकल रूम सुरु करणे अशा पर्यायांचा विचार करता येईल. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांनी मे महिन्याची सुटी रद्द करण्याच्या पर्यायाचाही विचार केला पाहिजे. कारण पंधरा वर्षावरील मुलांना थेट शिक्षणापासून बराच काळ वंचित ठेवण्याने त्यांचे भविष्यात कधीही न भरून येणार नुकसान होत आहे. या वयात मुलांना त्याचे परिणाम कदाचित कळणार नाहीत. अशावेळी या क्षेत्रातील जाणकारांनी व धोरणकर्त्यांनी खंबीर पावले टाकत नव्या पिढीच्या शिक्षणाची हेळसांड तातडीने थांबविली पाहिजे. यातच त्यांचे हित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com