कोरोना निर्बंधाबाबतचा एकमताने निर्णय घेणार : अजित पवार

कोरोना निर्बंधाबाबतचा एकमताने निर्णय घेणार : अजित पवार

पुणे, ता. ४ : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करण्यात येत आहे. केंद्र सरकारने निर्बंधांबाबत नुकताच निर्णय घेतला आहे. राज्यातही निर्बंधांबाबत जो निर्णय असेल तो मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करून एकमताने घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

मांजरी (जि. पुणे) येथे मंगळवारी (ता. ४) वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, नागरिकांचे हित जपण्यासोबतच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. शाळा सुरू ठेवण्याबाबत लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर निर्बंधांबाबत राज्य स्तरावर एकमताने योग्य तो निर्णय घेण्यात येईल. मास्क परिधान न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

ओबीसींना प्रतिनिधित्व गरजेचे

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ओबीसी आरक्षणाच्या वक्तव्याबाबत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘‘आव्हाड काय म्हणाले किंवा महाराष्ट्रात कोण काय म्हटले, ते सांगण्यासाठी मी मोकळा नाही. तुम्ही त्यांनाच प्रतिक्रिया विचारा. मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकालात निघाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेण्यात येऊ नये. कोणत्याही परिस्थितीत ओबीसींना प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबत निकाल दिला आहे. हा निर्णय देशभरात लागू होतो. त्यामुळे यामध्ये कोणीही राजकारण करू नये. राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी निष्णात वकील दिले आहेत.’’

आढळराव यांच्याशी चर्चेस तयार

गृहमंत्र्यांच्या एका जवळच्या कार्यकर्त्याने एका शिवसैनिकाला मारण्याची धमकी दिल्याचा आरोप शिवसेना नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी केला आहे. या संदर्भात पवार म्हणाले, ‘‘शिवसेना हा आमचा मित्रपक्ष आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. आढळराव यांचा काही गैरसमज झाला असेल तर तो दूर करण्यात येईल. मी त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे.’’

त्या जागेबाबत शंका होतीच...

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत २१ पैकी १४ जागा बिनविरोध आल्या. उर्वरित निवडणूक झालेल्या सातपैकी एक जागा गमवावी लागली. बारामती, दौंड, पुरंदरसह पाच जागेवर मताधिक्य मिळाले असून, आठ ठिकाणी मागे पडलो. परंतु उर्वरित जागेवर मोठ्या फरकाने विजय प्राप्त झाला. केवळ एका जागेवर कार्यकर्ते कमी पडल्यामुळे पराभव झाला. त्या जागेबाबत शंका होतीच, परंतु आम्ही का कमी पडलो याची बारकाईने माहिती घेत आहे, असे पवार यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com