Inflation
Inflation Sakal

अति झाली महागाई, कुटुंबाचे गणितच कोलमडले !

महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला पाहिजे

पुणे : महागाईमुळे सर्वसामान्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम झाला आहे. तसेच कुटुंबाचे मासिक खर्चाचे गणितही कोलमडले आहे. त्यामुळे जीवनशैलीतही बदल होऊ लागले आहेत. महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला पाहिजे. भोंगे, आरोप-प्रत्यारोप यामध्ये आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही, असे मत बहुसंख्य पुणेकरांनी आपल्या प्रतिक्रियांद्वारे ‘सकाळ’कडे व्यक्त केले.

गायत्री ठाकूर : खाद्यतेल प्रती किलो १२० वरून १८० रुपये झाले. डाळी, गहू, अन्न-धान्य किराणा यांचा खर्च वाढला. गॅस ६०० वरून १००० रुपये झाला. पेट्रोल-डिझेल तसेच मुलांची शाळा, क्लासची फी, स्टेशनरी हा सर्व खर्च वाढलाय. पूर्वी महिन्याचा खर्च २० हजार रुपये होता, तो आता ३० हजार रुपये झाला आहे.

संतोष बोकील : पेट्रोल दरवाढीवर इलेक्ट्रिक दुचाकीचा उत्तम पर्याय मी स्वीकारला आहे. चिंचवड ते पुणे रोजच्या कामानिमित्त प्रवासास महिना ३२०० रुपयांचे पेट्रोल आज लागत होते. तोच प्रवास मी महिना २०० रुपयांत सध्या करतो आहे.

माधव ताटके : केवळ इंधन दरवाढ नाही, तर अन्नधान्य, खाद्यतेल, भाज्या, फळे अशा सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. कोरोनानंतर महागाईमुळे सामान्य जनता होरपळून निघत आहे. बचत न होता जास्त खर्च होऊ लागला आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजीच्या वाढत्या किमतीमुळे ओला-उबर-रिक्षा यांच्या दरात वाढ होत आहे. महाराष्ट्रातील मंत्र्यांनी वरील परिस्थितीचा आढावा घेऊन आपापसांतील भांडणे, ईडी, भोंगा, सत्तांतर या गोष्टी बाजूला ठेवून सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यावर जास्त लक्ष केंद्रित करावे.

रोहन पगारे (धनकवडी) : इंधन दरवाढीने घराचा उंबरठा ओलांडला आहे. त्यामुळे गाडीचा वापर एकाच फेरीत अधिक कामे पूर्ण करण्यासाठी करतो. नातेवाइकांच्या भेटीगाठींवर बंधने घालून फोनवरूनच संवाद साधत आहे. रोजच्या गरजेच्या वस्तू खरेदीला प्राधान्य. हॉटेलिंग, आऊटींग बंद केले आहे. खाद्यतेलाचे दरही वाढल्याने जिभेचे चोचले बंद केले आहे. अनावश्यक गॅस वापर कमी केला आहे. मासिक खर्चात भरमसाट वाढ झाल्याने बचतीवर परिणाम झाला आहे.

प्रवीण वाळुंज : ज्या वेगाने महागाई वाढत आहे, ते पाहता सर्वसामान्य जनतेची चांगलीच तारेवरची कसरत चालू
झाली आहे. रोजच्या वाहतुकीस लागणारे पेट्रोल, सीएनजी, स्वयंपाकाचा गॅस, मुलांची शाळा, दैनंदिन जीवनात लागणाऱ्या सर्व वस्तु दिवसेंदिवस महाग होत आहेत. पण, त्या प्रमाणात सर्वसामान्य जनतेचा आर्थिक उत्पन्नाचा स्रोत वाढत नाही. नोकरीमध्ये पगारवाढ होत नाही. याला सर्वस्वी कारणीभूत सरकार आणि राजकीय पक्ष आहेत. आर्थिक नियोजनाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे

जयसिंग शिंदे : प्रचंड महागाईमुळे सामान्य माणसाचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने कर कमी करून महागाई नियंत्रित करण्यासाठी शक्य तितक्या लवकर प्रयत्न करणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com