अहिल्यादेवींनी भारतीय संस्कृती पुनरुज्जीवित केली मुख्यमंत्री फडणवीस ः पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण
सांगली, ता. १५ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी मुघलांच्या आक्रमणामुळे उद्ध्वस्त झालेल्या अनेक मंदिरे, तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार करून भारतीय संस्कृती पुनरुज्जीवित केली. त्यांनी २८ वर्षे राज्यकारभार करताना शौर्य, धर्मप्रियता, प्रशासन, समता, न्यायाचे राज्य प्रस्थापित केले. चंद्र, सूर्य असेपर्यंत आपण अहिल्यादेवी यांचे नाव घेतच राहू,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले.
सांगलीत संजय नगरमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात महापालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण आज फडणवीस यांच्या हस्ते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शानदार सोहळ्यात झाले. फडणवीस यांचा घोंगडे व काठी तसेच अहिल्यादेवींचे शिल्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार विशाल पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार जयंत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार विश्वजित कदम, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार इद्रिस नायकवडी आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, ‘‘मध्ययुगात अनेक राज्यकर्ते झाले. मात्र यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा राज्यकारभार आदर्श होता. त्यांच्या राज्यकारभारात लोकशाहीची, समतेची तत्त्वे पाहायला मिळतात. मराठा साम्राज्याच्या विस्तारात सुभेदार मल्हारराव होळकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या सूनबाई अहिल्यादेवी होळकर यांनीही शौर्य, आदर्श प्रशासन, समता, न्याय प्रस्थापित केला.
मुख्यमंत्री म्हणाले...
- अहिल्यादेवी यांनी विधवा महिलांना संपत्तीचा अधिकार बहाल केला
- माहेश्वरमध्ये साडी विणण्याचा व्यवसाय, उद्योग उभारला
- माळवा प्रांतात सतरा प्रकारचे कारखाने उभारून दारूगोळा, तोफा, शस्त्रास्त्रांची निर्मिती केली आणि राज्य सुरक्षित ठेवले
- आदिवासी बांधवांना एकत्र करून त्यांच्या हातात शस्त्रे देऊन त्यांची सेना केली आणि दरोडेखोर, लुटारूंचा बंदोबस्त करण्याचे काम केले
- पहिली महिला सैन्याची तुकडी निर्माण करण्याचे श्रेयही अहिल्यादेवी यांना जाते
ग्रामस्तरावर न्यायालये तयार करून गोरगरिबांना न्याय मिळेल याची व्यवस्था केली
अहिल्यादेवींच्या कार्यावर पुस्तक
फडणवीस म्हणाले, की अहिल्यादेवी यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्र सरकार त्यांच्या कार्याची माहिती देणारे पुस्तक तयार केले. त्यामध्ये दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश आहे. हे पुस्तक देशातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना पाठवले आहे. राज्यकारभार कसा असला पाहिजे, याची माहिती या पुस्तकातून व्हावी, हा उद्देश आहे. अहिल्यादेवी यांची जन्मभूमी असलेल्या चौंडीचा विकास आराखडा तयार केला आहे. चौंडीला राष्ट्रीय पातळीवरील प्रेरणास्थळ म्हणून विकसित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी उभे राहावा असे आपले स्वप्न होते. तसेच त्याचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावे असेही आपले स्वप्न होते. हे स्वप्न आज पूर्ण होत आहे. अहिल्यादेवींचे चरित्र वाचताना प्रेरणा मिळते. त्या कठोर प्रशासक होत्या. चांगल्या राज्यकर्त्या तसेच सामाजिक कार्यकर्त्याही होत्या.
चंद्रकांत पाटील, पालकमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

