
अवतीभवती
‘आंतरभारती’च्या शिबिराला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
पुणे, ता. ३१ ः विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी आंतरभारतीच्या पुणे शाखेतर्फे आझम कॅम्पसमध्ये नुकत्याच झालेल्या दोन दिवसांच्या शिबिरात १८ ते २४ या वयोगटातील ९४ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. दहा महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी त्यात भाग घेतला. शिबिराचे उद्घाटन आझम कॅम्पसचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी केले आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सुभाष वारे होते. डॉ. चैत्रा रेडकर, श्वेता व कृतार्थ, नूरखान पठाण, राजेंद्र बहालकर, डॉ. श्रुती तांबे, आरोह वेलणकर, कुणाल फडके, फुलफगर, प्रसाद भारदे यांनी मार्गदर्शन केले. आंतरभारती ट्रस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष पांडुरंग नाडकर्णी यांनी समारोप केला.
कन्या शाळेत पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात
पुणे, ता. ३१ ः कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. सायरस पूनावाला कन्या शाळेमध्ये नुकताच वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य परीक्षा परिषदेचे निवृत्त सहायक आयुक्त बी. जी. माळी उपस्थित होते.
वर्षभरात विविध क्षेत्रांत उत्तम यश संपादन केलेल्या विद्यार्थिनींना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. ‘‘मोठे झाल्यानंतर आपण जेव्हा शालेय जीवनात प्राप्त केलेली पारितोषिके पाहतो, तेव्हा त्या स्मरणरंजनात आपण रमून जातो. कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्टामुळेच आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकतो,’’ असा सल्ला संचेती यांनी विद्यार्थिनींना दिला.
‘काव्य स्पर्धेतील सहभागी कवींना सन्मान पत्र देणार’
पुणे, ता. ३१ ः महापालिकेच्या मराठी भाषा संवर्धन समितीने आयोजित केलेल्या काव्य स्पर्धेतील सहभागी कवींना सन्मान पत्रही न देता रिकाम्या हाताने पाठविल्यामुळे त्यांचा अवमान झाल्याचा आरोप मनसेचे शहर सचिव रमेश जाधव यांनी केला आहे. मराठी भाषा अधिकारी आणि शिक्षणाधिकारी मीनाक्षी राऊत यांना याबाबत जाधव यांनी निवेदन दिल्यावर, त्यांनी सहभागी कवींना सन्मान पत्र देण्याचे आश्वासन दिले.
वाहतूक कोंडीबाबत उपाययोजना करण्याची मागणी
पुणे, ता. ३१ ः शहराच्या मध्य वस्तीमध्ये वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महात्मा फुले मंडई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे उप शहरप्रमुख बाळासाहेब मालुसरे यांनी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. रस्त्यावरील लेनची शिस्त राखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पालिकेच्या मदतीने आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक, सीसीटीव्ही बसवावेत, अतिक्रमणे हटविण्यासाठी संयुक्त मोहीम तीन महिन्यांनी राबवावी, जड वाहनांना रात्री ११ ते सकाळी ७ या वेळेतच प्रवेश द्यावा, एकेरी मार्गाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करावी, वर्दळीचे रस्ते नो हॉकर, नो पार्किंग झोन घोषित करावेत, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.