
काश्मीरच्या मुलांनी चाखली महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांची चव
पुणे, ता. २० ः पुणे जिल्हा परिषदेच्या महाराष्ट्र जीवन उन्नती अभियानांतर्गत येथील गोळीबार मैदानावर भरवण्यात आलेल्या दख्खन जत्रेमध्ये येथे शिक्षण घेत असलेल्या काश्मीरमधील २३ विद्यार्थ्यांनी मराठमोळ्या खाद्यपदार्थांचा आनंद लुटला. यामध्ये पुरणपोळी, मिरचीचा खर्डा, पिठलं भाकरी, आणि वांग्याचे भरीत या महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांची चव विद्यार्थ्यांनी चाखली. या जत्रेत पुणे विभागातील महिला बचत गटांसाठी १८० स्टॉल उभारण्यात आले. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मागील तीन दिवसांपासून नागरिकांनी जत्रेला भेट दिली. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते जत्रेचे उद्घाटन झाले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त (विकास) विजय मुळे, जिल्हा ग्रामीण यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका शालिनी कडू आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही जत्रा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.