
राहुल गांधींकडून सैनिकांचे खच्चीकरण ः अनुराग ठाकूर
पुणे, ता. ११ ः काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा नसून, ती ‘भारत तोडो’ यात्रा ठरल्याचे त्यांच्या वर्तणुकीतून दिसून येत आहे. गुजरातसह ईशान्य भारतातील तीन राज्यांमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस नेस्तनाबूत झाली. त्यामुळे त्या नैराश्यातून ते परदेशात जाऊन सैनिकांचे मनोबल खच्ची होईल असे वक्तव्य करत आहोत, अशी टीका केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली.
भाजपच्या शहर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहराध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, धीरज घाटे, गणेश घोष, अर्चना पाटील, सुशील मेंगडे, राघवेंद्र मानकर आदी उपस्थित होते.
ठाकूर म्हणाले, ‘‘काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबीयांवर अन्याय केला जात असल्याचे राजस्थानमधील घटनेवरून समोर आले आहे. राहुल गांधी हे विदेशी भूमीवर जाऊन आपल्या देशातील सैनिकांचे मनोबल कमी होईल, असे वक्तव्य करत आहेत. आसाम आणि अरुणाचल प्रदेशात तैनात असलेल्या भारतीय जवानांना ते ‘ऑक्यूपाइड आर्मी’ असे संबोधत आहेत. असे असेल तर आसाम आणि अरुणाचल प्रदेशचा हा भूभाग भारताचा नाही का ? हे काँग्रेसने स्पष्ट करावे.’’
गुजरात, त्रिपुरा, नागालँड, मेघालय येथील निवडणुकीत काँग्रेस पक्ष नेस्तनाबूत झाला आहे. पुलवामा घटना केवळ एक कार अपघात असल्याचे सांगत सैनिकांचा अपमान करत आहेत. सर्जिकल स्ट्रईकचे पुरावे मागून सैनिकांचे मनोबल खच्चीकरण करत आहोत. काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी सैन्य दलाचे मजबुतीकरण केले नाही. उलट आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्यदलाचे मनोबल वाढविले असून अद्ययावतीकरणही सुरू केले आहे. त्यामुळे जगात भारताबद्दल आत्मविश्वास तयार झाला आहे, असे ठाकूर यांनी सांगितले.