
जल संधारणासाठी ‘रिव्हस्केप कॅफे’
पुणे, ता. १२ ः जल परिषदेच्या दुसऱ्याच दिवशी सहभागींनी गट चर्चेद्वारे जल संधारणासंबंधीच्या विविध विषयांवर चर्चा केली. विशेष म्हणजे रिव्हस्केप कॅफेद्वारे चार गटांमध्ये सहभागींनी चर्चा, उपाय आणि प्रत्यक्ष ॲक्शन प्लॅनची मांडणी केली. यामध्ये नदी पुनरुज्जीवनासंबंधी शाश्वत उपाय, पाणी व्यवस्थापन व संवर्धन, आपत्ती व्यवस्थापन आणि शाश्वत आर्थिक तरतुदींसंदर्भात गटांमध्ये चर्चा झाली.
गट चर्चेला ‘कॅफे’चे स्वरूप असल्याने सहभागींनी अत्यंत मोकळेपणे ही चर्चा केली. यात सहभागी विद्यार्थीनी सृष्टी रावणगावकर सांगते, ‘‘पहिल्या गटात आम्ही जल संवर्धनासाठी संस्थात्मक पातळीवर आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठीच्या उपायांवर चर्चा केली. नवीन तंत्रज्ञान आणि अद्ययावत मॉडेलच्या आधारे ही चर्चा झाली. नदी संवर्धनाच्या गटामध्ये आम्ही भू-जल आणि जमिनीवरील पाण्याच्या ऱ्हासा संदर्भात चर्चा केली व त्यावरील दीर्घकालीन उपाय सुचविले.’’ दरम्यान, आध्यात्मिक गुरू श्री एम यांनी सर्व सहभागींशी प्रत्यक्ष संवाद साधला.