मंदिरांकडून होणारी रुग्णसेवा हीच समाजसेवा

मंदिरांकडून होणारी रुग्णसेवा हीच समाजसेवा

पुणे, ता. २२ ः देशात मठ व मंदिरांनी धार्मिक कार्यासह रुग्णालये सुरू करून समाजाची सेवा सुरू केली. सेवा हाच भारताचा खरा चेहरा आहे. शरीर स्वास्थापेक्षा मानसिक स्वास्थ्याचा प्रश्‍न जटील असल्याने त्यासाठी काम करावे लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी केले.

पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठानतर्फे खडी मशिन चौक येथे नियोजित असलेल्या बाळासाहेब देवरस रुग्णालयाच्या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला, संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव या वेळी उपस्थित होते. डॉ. मनसुख मांडवीय आणि श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज हे दोघेही ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रमात सहभागी झाले.

भैय्याजी जोशी म्हणाले, ‘‘सध्याचे राजकारण व वातावरण पूर्वग्रह दूषित झालेले आहे. त्यामुळे संभाजीनगर येथील रुग्णालयाला डॉ. हेडगेवार यांचे नाव दिल्याने काही नुकसान झाले नाही का? असे मी तेथील डॉक्टरांना विचारले. त्यांनी या नावामुळे काहीच नुकसान झाले नाही, पण जबाबदारी वाढल्याचे सांगितले. शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी संस्था, खासगी संस्थांची यासह कोणत्याही माध्यमातून रुग्णांना उपचार देणे गरजेचे आहे.’’

चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘समाजातील घटनांना काय हवे आहे हे संघाने ओळखून अनेक सेवा कार्य सुरू केले. लातूर, संभाजीनगर येथे रुग्णालय सुरू केले. शाळा, वसतीगृह सुरू केले. इतर शहरातून येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांना राहण्यासाठी व्यवस्था याची पुण्यात आवश्‍यकता आहे.’’ मनसुख मांडवीय म्हणाले, ‘‘संघाच्या आरोग्य भारती प्रकल्पातून लाखो जणांचे प्राण वाचले आहेत. पंतप्रधानांनी गरीबी अनुभवली असल्याने प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री जनऔषधी योजना यासह अन्य योजनांमधून जनतेचे भले होत आहे.’’

देवरस यांचे समाज कार्याचे आवाहन
स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले, ‘‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय संघचालक बाळासाहेब देवरस यांनी समाज कार्यात काम करण्याचे आवाहन केले होते. समाजाची सेवा करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे.’’ प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. अनिरुद्ध दडके यांनी सूत्रसंचालन तर प्रतिष्ठानचे कार्यवाह बद्रीनाथ मूर्ती यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com