जकातदार यांची ग्रंथसंपदा समाजात शांतता वाढवेल

डॉ. मोरेश्‍वर गोसावी यांचे मत; अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांचा विशेष सत्कार

जकातदार यांची ग्रंथसंपदा समाजात शांतता वाढवेल डॉ. मोरेश्‍वर गोसावी यांचे मत; अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांचा विशेष सत्कार

Published on

पुणे, ता. २२ : ‘‘ज्योतिषशास्त्र हे समाजाला मार्गदर्शन करणारे शास्त्र असून त्यातून कायम सकारात्मक शक्ती मिळते. ज्योतिषशास्त्राचे अभ्यास करणारे भरपूर आहेत. परंतु, पं. विजय जकातदार व त्यांच्या कुटुंबीयांनी या क्षेत्रात ग्रंथनिर्मिती करून ज्योतिषशास्त्रासारख्या विषयाला एक आकृतिबंध प्राप्त करून दिल्यामुळे या विद्येला चांगले दिवस आले. त्यांनी लिहिलेले ग्रंथ व त्यांनी उभारलेल्या कामामुळे समाजात शांती व सौख्य वाढण्यास मदत होईल’’, असे मत ज्योतिष अभ्यासक आणि संशोधक डॉ. मोरेश्‍वर गोसावी यांनी रविवारी व्यक्त केले.

बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळ व फलज्योतिष अभ्यास मंडळ यांच्यावतीने पं. विजय जकातदार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचा माजी आमदार उल्हास पवार व गोसावी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी प्रतिभा शाहू मोडक, डॉ. वा. ल. मंजुळ, प्रा. जवाहर मुथा, चंद्रकांत शेवाळे, मोहन दाते, आनंदकुमार कुलकर्णी, सतीश जकातदार आदी उपस्थित होते.

डॉ. गोसावी म्हणाले, ‘‘स्वतःच्या जीवनासह इतरांच्या जीवनाला वळण देण्याची ताकद ज्योतिषशास्त्रमध्ये आहे. ज्योतिषशास्त्रमध्ये अभ्यास वर्ग चालवून या क्षेत्रासाठी पं. जकातदार यांनी अनेक पिढ्या घडविल्या. समाजात शांती, सौख्य वाढवायचे असेल तर आनंदाने मला त्यासाठी काय करता येईल, हे जकातदार यांनी आपल्या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाद्वारे दाखवून दिले.’’

पवार म्हणाले, ‘‘खगोलशास्त्र, वायुशास्त्र, अवकाशशास्त्र याचा अभ्यास, पृथ्वी गोल असल्याचे तत्त्व गॅलिलिओ या शास्त्रज्ञाच्या नावावर मांडले जाते. असे असले तरीही, संत ज्ञानेश्‍वर यांनी त्यांच्या ग्रंथांमधून पृथ्वी गोल असल्याचा सिद्धांत मांडल्याचे त्यांच्या ग्रंथरचनेतून आपल्याला समजते. तर गॅलिलिओच्या नावावर हे शोध मांडले जात आहेत. केवळ तेवढेच नाही, तर लोकमान्य टिळकांनीही ज्योतिषशास्त्राचा मोठा अभ्यास केला. ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासासाठी चिंतन, मनन यांची जोड असणे आवश्‍यक आहे. पं. विजय जकातदार यांच्या तीन पिढ्यांनी या क्षेत्रात योगदान दिले आहे. त्यांची ज्योतिष शास्त्रातील हीच परंपरा अखंडितपणे सुरू राहील.’’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. मालती शर्मा यांनी केले.

ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करताना आपल्याकडे येणाऱ्या व्यक्तींना घाबरविण्यापेक्षाही त्यामधील सकारात्मक ऊर्जा त्यांना देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. एखाद्याची कुंडली पाहिल्यानंतर ‘अरे बाप रे’ ऐवजी ‘अरे वा’ असे म्हणत त्यांचे गुण सांगत ज्योतिष शास्त्रज्ञाने कायम शिल्पकाराच्या भूमिकेत राहिले पाहिजे. या क्षेत्रात समाजाचा सहभाग कसा वाढेल, याकडे लक्ष दिले पाहिजे.
- पं. विजय जकातदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com