Weather Update : उत्तर महाराष्ट्राबरोबर विदर्भात पावसाचा इशारा
पुणे : राज्यात कोकण किनारपट्टीवर उन्हाचा चटका आणि उत्तर महाराष्ट्राबरोबरच पश्चिम विदर्भात वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ शुक्रवारीही (ता. २६) हवामान खात्याने कायम ठेवला. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मात्र हवामानाचा कोणताही इशारा नसल्याचे खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले. राज्यात सर्वाधिक तापमान जळगाव येथे ४२.७ अंश सेल्सिअस नोंदले गेले.
राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी पडत आहेत. त्यात ढगांचा गडगडाटासह विजांचा कडकडाट होत आहे. त्यामुळे वीज पडण्याच्या दुर्घटनेपासून सावध राहण्यासाठी सतर्कतेचा इशाराही हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या बहुतांश भागात वादळी वाऱ्याचा ‘यलो अलर्ट’ दिला होता. त्यातून आता पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना कोणताही इशारा नसल्याने तेथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
कोकणात चटका वाढणार
मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे येथील उष्णतेच्या लाटेमुळे या भागातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचा संदेश या इशाऱ्यातून हवामान खात्याने दिला आहे.
उत्तर महाराष्ट्रात वादळी वारे
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगावसह नगर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, पश्चिम विदर्भातील बुलडाणा, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, अकोला, भंडारा येथे वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होईल, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.