पाणी प्या, योग्य आहार घ्या
अन् सुती, सैल कपडे वापरा

पाणी प्या, योग्य आहार घ्या अन् सुती, सैल कपडे वापरा

पुणे, ता. २३ : शहरात उन्हाचा चटका पुन्हा वाढला आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती सध्या शहराच्या वेगवेगळ्या भागात दिसत आहे. उष्णतेशी संबंधित समस्यांना प्रतिबंध करण्यासाठी सातत्याने पाणी पिणे, योग्य आहार आणि सुती, सैल कपड्यांचा वापर या त्रिसूत्रीचा वापर करावा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
शहरात गेल्या दोन दिवसांपासून कमाल तापमान पुन्हा सरासरीपेक्षा दोन ते चार अंश सेल्सिअसने वाढला आहे. कमाल तापमानाच्या पाऱ्याने पुन्हा चाळिशी ओलांडल्याने मदरहूड हॉस्पिटलमधील प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. स्वाती गायकवाड यांनी हा सल्ला दिला आहे.

उष्णतेची लाट म्हणजे काय?
उष्णतेची लाट ही एक मूक आपत्ती आहे. सलग तीन दिवस कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान ३ डिग्री सेल्सिअसने जास्त असेल, तर त्याला उष्णतेची लाट म्हणतात.

काय परिणाम होतो?
- उष्णतेशी संबंधित (सौम्य ते गंभीर) आजारांमध्ये अंगावर पुरळ, सूज (उष्णतेमुळे हात, पाय आणि घोट्याला सूज येणे), पेटके (उष्णतेमुळे स्नायूंमध्ये पेटके), उष्माघात, गोंधळल्यासारखे वागणे, काहीही न सुचणे, उष्णतेमुळे थकवा यांचा समावेश होतो.
- उष्णतेमुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी, श्वसन, मूत्रपिंड रोगांसारख्या जुनाट आजारांवरील ताण देखील वाढू शकतो.
- गर्भवतींमध्ये निर्जलीकरणामुळे अम्नीओटिक द्रवपदार्थ कमी होऊ शकतो.
- काही अभ्यासात असेही आढळून आले आहे की, तापमानात प्रत्येक एक डिग्री सेल्सिअसच्या वाढीमागे गर्भधारणेदरम्यान होणारा मधुमेहाचा धोका अंदाजे ६ टक्क्यांनी वाढतो.
- उच्च तापमानामुळे गर्भाशयाला आणि त्यामुळे गर्भाला होणारा रक्तप्रवाह कमी होतो. यामुळे बाळाला ऑक्सिजन आणि पोषण कमी होते.

उपाययोजना-
- अतिउष्णतेच्या परिस्थितीत शरीरात पाण्याचे पुरेसे प्रमाण असणे गरजेचे आहे. त्यासाठी तहान लागली नसली तरीही जेव्हा शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्यावे.
- प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.
- ताजे व हलके अन्न खाऊनच घराबाहेर पडावे.
- फळे आणि सलाडसारखे पचायला हलके असणारे अन्न खावे.
- सैल, सुती, आरामदायी शक्यतो फिकट रंगाचे कपडे परिधान करावे.
- उन्हात बाहेर जाताना डोके झाकावे.
- भरपूर पाणी, ओआरएस पाण्याचे द्रावण, ताक किंवा लस्सी, लिंबूपाणी, कैरीचे पन्हे इत्यादी घरगुती पेय घ्यावे.
- थोडेसे मीठ घालून फळांचा रस घ्यावा.
- टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबीर, इतर स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यांसारख्या उच्च पाण्याचे प्रमाण असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाव्यात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com