पुणेकरांनी दिलेला कौल 
सकारात्मक राजकारणाचा विजय

पुणेकरांनी दिलेला कौल सकारात्मक राजकारणाचा विजय

पुणे, ता. ४ : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये आम्ही विकासाच्या मुद्द्यांना भर दिला. पुणे एक उत्तम शहर झाले पाहिजे, या दृष्टीने मुद्दे मांडत गेलो आणि त्यास पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने माझा विजय निश्चित झाला आहे. पुणेकरांनी दिलेला कौल म्हणजे सकारात्मक राजकारणाचा विजय आहे. येत्या काळात पुण्यातील महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू अशी भावना भाजपचे विजयी उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत मोहोळ यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाल्यानंतर त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली.

मोहोळ म्हणाले, ‘‘माझ्यासारख्या बूथ स्तरावरच्या कार्यकर्त्याला पक्षाने नगरसेवक केले, महापौर केले आणि आता खासदारही केले. भाजप हा पक्ष कार्यकर्त्यांना ताकद देणारा आहे. त्यामुळेच मला हे यश संपादन करता आले. माझ्या विजयात भाजपचे नेते, कार्यकर्त्यांसह महायुतीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचा, कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा मोठा वाटा आहे. सामूहिक प्रयत्नांतून माझा विजय साकारला गेला आहे.’’

मला बदनाम करण्याचा प्रयत्न
प्रचारादरम्यान माझ्यावर वैयक्तिक आरोप करून, सोशल मीडियातून विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. पण पुणेकरांनी त्यास थारा दिला नाही. पुणेकरांना अशाप्रकारे प्रचार केलेला आवडत नाही, हे देखील यातून स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत कोणावरही टीका न करता आपले विकासाचे मुद्दे मांडणे, भविष्यातील पुणे कसे असेल याच्या संकल्पना पुणेकरांपुढे मांडण्यास आम्ही महत्त्व दिले. शहरातील कोणत्याही समस्येवर मी तोडगा काढावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. त्यामुळे ते सोशल मीडियामध्ये व्यक्त होत असतात, त्याचा मी सन्मानच करतो, असेही मोहोळ म्हणाले,


देशाच्या विकासात पुण्याचे योगदान
देशाच्या विकासामध्ये पुण्याचे मोठे योगदान आहे. भविष्यात देखील पुण्याची भूमिका महत्त्वाची असणार आहे. असे असताना पुणे मेट्रोचे विस्तारीकरण, पुणे विमानतळाचे प्रश्न सोडविणे, खडकी आणि पुणे कॅंटोंन्मेंट यांचे पुणे महापालिकेत समायोजन करणे, पीएमपीच्या ताफ्यामध्ये बस संख्या वाढविणे यांसह अनेक प्रश्न आहेत, ते टप्प्याटप्प्याने सोडविण्यावर माझे प्राधान्य असेल, अशी ग्वाही मोहोळ यांनी दिली.

कोथरूड सोडा, कसबाही ताब्यात
विरोधी पक्षाच्या उमेदवाराने या निवडणुकीत कोथरूड मतदारसंघातून भाजपला रोखणार असल्याचा दावा केला होता. ‘‘पुणेकरांनी केलेले मतदान पाहता विरोधी पक्षाच्या उमेदवाराला कोथरूडमध्ये आम्हाला रोखता आलेले नाहीच. मात्र, कसबा विधानसभा मतदारसंघात आम्ही मताधिक्य घेऊन पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे. हा सुसंस्कृत राजकारणाचा विजय आहे. यातून तरी ते शहाणे होतील’’, असा टोला मोहोळ यांनी रवींद्र धंगेकर यांना लगावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com