Sharad Pawar
Sharad Pawarsakal

Sharad Pawar : मनमानी करणाऱ्यांना जनतेने जागेवर आणले

‘देशाचा कारभार मनमानी पद्धतीने चालविण्याचे काम दोन व्यक्तींनी केले. आपल्या म्हणण्याप्रमाणेच नीती, धोरण हे सूत्र त्यांनी राबविले. देशातील जनतेनेच त्यांची दखल घेतल्यानंतर आता त्यांच्यावर मर्यादा आल्या आहेत.

पुणे : ‘‘देशाचा कारभार मनमानी पद्धतीने चालविण्याचे काम दोन व्यक्तींनी केले. आपल्या म्हणण्याप्रमाणेच नीती, धोरण हे सूत्र त्यांनी राबविले. देशातील जनतेनेच त्यांची दखल घेतल्यानंतर आता त्यांच्यावर मर्यादा आल्या आहेत. सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून या घडामोडी लवकरच देश बघेल’’, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांचे नाव न घेता सोमवारी टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाचा कार्यक्रम शहर पक्ष कार्यालयात झाला. पवार यांच्या हस्ते व खासदार सुप्रिया सुळे, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले. यावेळी पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी खासदार ॲड. वंदना चव्हाण, पक्षाचे प्रवक्ते नेते अंकुश काकडे, माजी आमदार ॲड. जयदेव गायकवाड, माजी शहराध्यक्ष रवींद्र माळवदकर, प्रकाश म्हस्के आदी उपस्थित होते.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पवार म्हणाले, ‘‘गेल्या २५ वर्षांत पक्ष संघटना उभी करून महाराष्ट्रात, देशात नवा इतिहास तयार केला. सत्तेशी संबंध नसणारे तरुण पुढे आले. त्यांना राज्यपातळीवर नेतृत्व दिले. आता आपण पक्ष आणखी पुढे घेऊन जाऊ’’. यावेळी पक्षासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान पवार यांच्या हस्ते झाला.

‘सत्ता तुमच्या हातात असेल’
विधानसभेची निवडणूक येत्या तीन-चार महिन्यांत होईल. त्यामुळे आता सगळ्यांनी विधानसभा निवडणुकीवर लक्ष द्यायचे आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्राची सत्ता तुमच्या हातात असेल, अशी भूमिका घेऊ. या सत्तेचा उपयोग जास्तीत-जास्त लोकांना कसा होईल, याची आपण काळजी घेऊ, असा विश्‍वासही पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

मंत्रिपदाचा फायदा ठेकेदारांना नको ः सुळे
‘‘लोकसभा निवडणुकीच्या निकालाने जबाबदारी वाढली आहे. पुण्यातील उद्योग बाहेर जात आहेत, ही चिंतेची बाब आहे. पुण्याला मंत्रिपद मिळाले, याचा आनंद आहे. पण त्याचा फायदा ठेकेदारांना न होता पुणेकरांना व्हायला पाहिजे’’, असे मत सुळे यांनी व्यक्त केले. रवींद्र धंगेकर यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरीही, ऑक्‍टोबरमध्ये ते पुन्हा आमदार होतील. पुण्यात प्रशासन नाहीच. कोयता गॅंग तोडफोड करत आहे. पाणी तुंबते आहे. ससूनची बदनामी सुरू आहे. त्यामुळे पुण्यासाठी पक्षविरहीत फोरम स्थापन करण्याची गरज आहे, असेही सुळे यांनी नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com