सरकारी काम, समान पाण्यासाठी थांब!

सरकारी काम, समान पाण्यासाठी थांब!
Published on

पुणे, ता. २२ ः पुणेकरांना समान पाणी देण्यासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या योजनेचे काम २०१७ मध्ये सुरू केले. या प्रकल्पाचे सुमारे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. पण वाहतूक पोलिसांसह अन्य शासकीय विभागांकडून कामासाठी लवकर परवानगी मिळत नसल्याने योजनेचे काम मंदावले आहे. या प्रकल्पाच्या कामाची मुदत डिसेंबर २०२४ मध्ये संपणार आहे. पण परवानगी न मिळाल्यास काम आणखी रखडणार आहे.
पुणे महापालिकेने २०१७ मध्ये एक हजार ९७३ कोटी रुपयांच्या समान पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू केले. यासाठी शहराची पाच पॅकेजमध्ये विभागणी करून प्रत्येक कामाची निविदा काढण्यात आली आहे. यापैकी पॅकेज एक, दोन, तीन आणि पाच पॅकेजचे काम एका ठेकेदार कंपनीकडून सुरू आहे. तर पॅकेज चारच्या कामासाठी स्वतंत्र ठेकेदार नियुक्त केला आहे. पॅकेज एक, दोन, तीन आणि पाचचे काम सुमारे ८५ टक्के पूर्ण झाले आहे. तर पॅकेज चारचे काम सुमारे ३० टक्के पूर्ण झाले आहे.

अडीचशे किलोमीटरची खोदाई शिल्लक
शहरात एकूण १२०० किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यापैकी आत्तापर्यंत ९५० किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. उर्वरित २५० किलोमीटरचे काम शिल्लक आहे. त्याच प्रमाणे मुख्य वितरण व्यवस्थेसाठी १०३ किलोमीटरची जलवाहिनी टाकली जाणार असून त्यापैकी ८७ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. शहरात अनेक ठिकाणी अरुंद रस्ते व वाहतूक कोंडीमुळे पोलिसांकडून खोदाईसाठी परवानगी मिळत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मिटर बसविण्याचे काम संथ
या योजनेअंतर्गत प्रत्येक नळजोडला मिटर बसविण्यात येणार आहे. यासाठी २ लाख ८२ हजार इतकी संख्या निश्‍चित केली आहे. त्यापैकी १ लाख ६४ हजार २८७ मिटर बसवून झाले आहेत. अजून १ लाख १८ हजार मिटर बसविण्याचे काम शिल्लक आहे. मिटर बसविण्याचे काम वेगात व्हावे यासाठी पाणी पुरवठा विभागाने मनुष्यबळ वाढविण्यास सांगितले होते. तरीही त्याचा फायदा झालेला नसल्याचे दिसून येत आहे.

अडीच वर्षांत ४० टक्के काम
पुणे महापालिकेत प्रशासक राज येण्यापूर्वी २०१७ ते २०२२ या कालावधीत ४५.११ टक्के काम झाले होते. सुरवातीच्या टप्प्यात नगरसेवकांनी, राजकीय पदाधिकाऱ्यांनी या योजनेचे काम करताना प्रभागात अडवणूक सुरू केली होती. त्यामुळे कामाचा खोळंबा झाला होता. पण २००२ ते २०२४ या कालावधीत ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रशासक काळातील कामाचा वेग जास्त आहे.

समान पाणी पुरवठा योजनेतील पॅकेज क्रमांक एक, दोन, तीन आणि पाचचे काम पूर्ण करण्यासाठी डिसेंबर २०२४ पर्यंतची मुदत आहे. योजनेचे सरासरी ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. शिल्लक काम हे अवघड असून तेथे वाहतूक पोलिस, वन विभागाकडून परवानगी मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याची परवानगी लवकर मिळाल्यानंतर मुदतीत काम पूर्ण होईल, अन्यथा मुदतवाढ घ्यावी लागेल.
- श्रीकांत वायंदडे, कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा

पाणी पुरवठ्याबाबत तक्रारी
- जलवाहिनी शहरात मिटर बदलल्यानंतर पाणी कमी दाबाने येते
- पाणी पुरवठ्याची वेळ कमी झाली आहे
- पाण्याच्या टाक्या बांधून असल्या तरी त्याचा आम्हाला उपयोग नाही
- टँकर माफियांसाठीच योजनेचे काम अर्धवट ठेवले आहे.

परवानगी रखडण्याची कारणे
- अरुंद रस्त्यावर खोदकाम करावे लागणार
- खोदकाम केल्याने वाहतूक कोंडीत भर पडणार
- वाहतूक वळविण्यासाठी पर्यायी रस्ते चांगले हवेत
- सणांच्या काळात खोदकाम केल्यास नागरिकांना त्रास होतो

योजनेची सद्यःस्थिती
१) पाण्याच्या टाक्यांची संख्या - ८२
२) बांधून पूर्ण झालेल्या टाक्या - ६०
३) टाकल्या जाणाऱ्या जलवाहिन्या - १२०० किलोमीटर
४) आत्तापर्यंत टाकलेली जलवाहिनी - ९५० किलोमीटर
५) बसविण्यात येणार मीटर - २.८४ लाख
६) आत्तापर्यंत बसवलेले मीटर - १.६४ लाख
७) योजनेचे संपलेले काम - ७५ टक्के
८) योजना पूर्ण होण्याची मुदत - डिसेंबर २०२४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com