कृष्णा-भीमा अस्तिरीकरणासाठीचे सर्व्हेक्षण सुरू ः विखेपाटील
पुणे, ता. १५ : ‘‘कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प पुढे नेण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. पहिल्या टप्प्यात पंचगंगा नदीचे पाणी राधानगरी धरणातून दूधगंगेत नेण्याचे विचाराधीन आहे. त्यासाठी बोगदा खोदाईसह १६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यातून सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी बॅरेजेस उभारले जातील. मात्र, पुराचे ६५ अब्ज घनफूट पाणी बोगद्याद्वारे भीमेत आणण्याचा दुसरा प्रस्ताव खर्चिक आहे. त्यासाठी केंद्र सरकार, जागतिक बॅंक, नाबार्ड, आशियाई विकास बॅंकेकडून निधी मिळवण्याचे विचाराधीन आहे. त्याचे सर्वेक्षण अद्यापही सुरू आहे, अशी माहिती जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी दिली.
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कृष्णेचे पाणी मराठवाड्याकडे वळविण्याच्या मुद्द्यावर विचारले असता विखे पाटील यांनी ही माहिती दिली. तसेच, कोकणात जाणारे पाणी वळविण्याच्याही हालचाली चालू आहेत. विशेषतः उल्हास खोऱ्याचे ६५ अब्ज घनफूट पाणी गोदावरी खोऱ्यात येऊ शकते. त्याचा अंतिम सर्वेक्षण अहवाल येत्या जानेवारीपर्यंत प्राप्त होईल. कृष्णा खोरे द्वितीय लवाद निवाड्यानुसार राज्याच्या वाट्याला आलेले पाणी प्रत्यक्ष वापरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचे सादरीकरण येत्या पंधरवड्यातच होईल, असे ते म्हणाले.
२०२६ पासून तुमचे पगार तुम्हीच करा
जलसंपदा विभागांतर्गत असलेली सर्व महामंडळे एकत्र करून कंपनी करण्यासंदर्भात विचार सुरू आहे, त्याबाबत विचारले असता विखे पाटील म्हणाले, ‘‘जलसंपदा विभागाची महामंडळे पूर्णतः स्वायत्त आहेत. महामंडळाच्या उत्पन्नाचे स्रोत कसे वाढविता येतील, यादृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहेत. मत्स्यपालन, पर्यटन अशा विविध गोष्टींतून ते वाढू शकते. २०२६ पासून तुमचे पगार शासनाच्या नव्हे, तर स्वउत्पन्नातून करा, त्यादृष्टीने उत्पन्न कसे वाढेल, याचा विचार करा, अशा सूचना महामंडळांना देण्यात आल्या आहेत.’’