खाडाखोड केलेल्यांना कुणबी दाखले देणार नाही
पुणे, ता. १७ : ‘‘खाडाखोड केलेल्या कागदपत्रांच्या आधारे कुणालाही कुणबी दाखले देण्यात येणार नाहीत. छगन भुजबळ यांच्यासमोर काही प्रकरणे आली असतील, तर त्यांनी तक्रार दाखल करावी,’’ असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना दिला.
राज्य सरकारच्या सेवा पंधरवडा उपक्रमाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी दाखले देण्यास सुरुवात झाली आहे का, अशी विचारणा त्यांना करण्यात आली. त्यावर ते म्हणाले, ‘‘राज्य सरकारने याबाबत अध्यादेश काढला आहे. त्यानुसार जे पात्र आहेत, त्यांनाच कुणबी दाखले मिळतील. किती जणांना आतापर्यंत दाखले मिळाले, याची आकडेवारी सध्या उपलब्ध नाही. मात्र, कुठेही दाखले दिले जात नसल्याची तक्रार आलेली नाही. कागदपत्रांची योग्य पडताळणी आणि स्थापन केलेल्या दोन समित्यांच्या अहवालांच्या आधारेच दाखले दिले जातील.’’
मंत्री भुजबळ यांनी कागदपत्रांत खाडाखोड करून कुणबी दाखले दिले जात असल्याचा आरोप केला होता. त्यावर फडणवीस म्हणाले, ‘‘कागदपत्रांमध्ये खाडाखोड चालणार नाही. ज्यांच्याकडे मूळ दाखले आहेत, त्यांच्याच नातेवाइकांना कायद्यानुसार दाखले मिळू शकतात. एखाद्याच्या दाखल्यावर आक्षेप असल्यास तक्रार करता येईल आणि त्यावर कारवाई केली जाईल.’’ पूजा खेडकर कुटुंबाबाबत विचारले असता, फडणवीस म्हणाले, ‘‘ते सापडतीलच, कुठे जाणार आहेत?’’
कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढविणार असल्याच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, ‘‘महाराष्ट्राचा याला ठाम विरोध आहे. आवश्यकता भासल्यास सरकार सर्वोच्च न्यायालयात जाईल आणि कर्नाटक सरकारविरोधात याचिका दाखल करेल.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.