पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘सकाळ रिलिफ फंड’कडून आवाहन
पुणे, ता. २४ ः महाराष्ट्रात आणि देशात नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी तातडीची मदत पाठविणे व प्रभावित घटकांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने १९४३ पासून ‘सकाळ रिलीफ फंड’ सामाजिक जाणिवेतून भरीव कार्य सातत्याने करत आहे. आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाण्याची परंपरा कायम ठेवत राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी व पुनर्वसनासाठी ‘सकाळ रिलीफ फंड’कडून समाजाला मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.
वर्षानुवर्षे सततचा दुष्काळ व पाणीटंचाई अनुभवलेल्या मराठवाड्यावर यंदा अतिवृष्टीमुळे महापुराचे संकट आले आहे. मराठवाड्यातील धाराशिव, बीड, लातूर, परभणी, जालना आणि सोलापूरसह राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्ये सततच्या पावसामुळे नद्यांना महापूर आला असून, अनेक मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अनेक गावांना पुराचा तडाखा बसला आहे. याशिवाय अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे गावांचा संपर्क तुटला आहे. पुरामुळे शेतांमध्ये चिखल झाला असून, खरिपाची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. पुराच्या पाण्यामुळे काही ठिकाणी शेती व जनावरे वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
‘सकाळ रिलीफ फंड’चे कार्य
१. १९६१ मध्ये पानशेत धरण दुर्घटनेनंतर एक लाख ५० हजार निधी जमा करून तातडीची मदत म्हणून दहा हजार लोकांना कपडे वाटप केले होते.
२. १९७७ मध्ये आंध्र प्रदेशातील चक्रीवादळ तातडीची वैद्यकीय मदत म्हणून दोन लाख रुपये किमतीची पन्नास हजार लोकांसाठी औषधे पाठविण्यात आली होती.
३. १९९३ मध्ये मराठवाड्यातील भूकंप दुर्घटनेनंतर ६ हजार लोकांसाठी चार ठिकाणी मोफत जेवणाची सोय केली. पुनर्वसन म्हणून एक कोटी २८ लाख रुपयांचा निधी संकलित करून प्रभावित सात गावांमधील सात शाळांचे नूतनीकरण व मुला-मुलींसाठी एका वसतिगृहाचे बांधकाम करण्यात आले.
४. १९९९ कारगिल युद्ध युद्धात जखमी होऊन अपंगत्व आलेल्या पाच हजार भारतीय सैनिकांना एक कोटी १० लाख रुपये किमतीचे शारीरिक हालचाल व्यवस्थित करणारे वैद्यकीय साहित्य व उपकरणे यांचे वाटप. सैनिकांच्या मुलींसाठी चार जिल्ह्यांमध्ये पुणे, कोल्हापूर, अमरावती व रत्नागिरी येथे दोन कोटी ६० लाख रुपये खर्च करून वसतिगृहांची उभारणी करण्यात आली.
५. २००१ गुजरात भूकंप तातडीची मदत म्हणून १२ लाख रुपयांचा निधी जमा करून रक्त संकलन करण्यासाठी रुग्णवाहिका गुजरात राज्याला पाठविण्यात आली. तसेच, तीन कोटी रुपये संकलित करून प्रभावित भागातील ७० शाळांचे नूतनीकरण, बांधकाम व एका वसतिगृहाची उभारणी करण्यात आली.
६. २०१४ मध्ये पुणे जिल्ह्यातील माळीण हे गाव डोंगरकडा कोसळून गाडले गेले होते. ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे जमा झालेल्या एक कोटी २५ लाख रुपयांच्या देणगीतून माळीण व आंबेगाव तालुका परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एका वसतिगृहाची उभारणी करण्यात आली आहे.
७. २०१९ कोल्हापूर सांगली महापूरप्रसंगी एक कोटी १८ लाख सत्याऐंशी हजार रुपये संकलित करून तातडीची मदत म्हणून अन्नधान्य किट, कपडे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप. तसेच, कोल्हापूर-सांगली भागातील ४१ शाळांना इमारत दुरुस्ती, शैक्षणिक व भौतिक साहित्य खरेदी, वर्गखोल्या बांधकाम व शाळांच्या नूतनीकरणासाठी मदतीच्या आठ टप्प्यात दोन कोटी ६७ लाख २६ हजार रुपयांची मदत.
८. २०१८ मध्ये केरळमध्ये आलेल्या महापुरामुळे आलाप्पुझा जिल्ह्यातील दुर्गम अशा कुट्टमंगलम भागातील श्री नारायण धर्म परिपालनायोगम (एसएनडीपी) या शाळेच्या नवीन इमारत बांधकामासाठी ‘सकाळ रिलीफ फंड’अंतर्गत जमा झालेल्या केरळ पूरग्रस्त निधीतून एक कोटी ३० लाख रुपयांची मदत.
९. २०२३ मध्ये रायगड जिल्ह्यात इर्शाळवाडी गावावर डोंगरकडा कोसळून गाव गाडले होते. इर्शाळवाडीतील आपत्तिग्रस्त शालेय विद्यार्थ्यांना ‘सकाळ रिलीफ फंड’कडून शैक्षणिक शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मदत.
१०. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील भारत पाक सीमेवरील दर्दपोरा गावात प्राथमिक शाळेच्या इमारतीचे बांधकाम.
मदतीचे आवाहन
राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी समाजाला ‘सकाळ रिलीफ फंड’कडून मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.
मदत करण्यासाठी
१. IDBI Bank
Name :- Sakal Relief Fund
A/C No: 45910010013026
IFSC: IBKL0000459
Branch :- Bajirao Road, Pune.
या खात्यावर देणगीची रक्कम ऑनलाइन पद्धतीने बँक ट्रान्स्फर करू शकता. देणगी बँक खात्यात ट्रान्स्फर केल्यानंतर ८६०५०१७३६६ या व्हॉट्सअॅप नंबरवर ट्रान्सझॅक्शन तपशील पाठवावेत.
२. मदतीचे धनादेश ‘सकाळ रिलीफ फंड’ या नावाने दैनिक ‘सकाळ’च्या कार्यालयात ११ ते ५ या वेळेत स्वीकारले जातील.
३. ‘सकाळ रिलीफ फंडा’साठीच्या देणग्या प्राप्तिकर कायद्याच्या ८० जी कलमांतर्गत प्राप्तिकर सवलतीस पात्र आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.