पथदिव्यांनी उजळणार पुण्याचे रस्ते
पुणे, ता. १३ : महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांसह शहराच्या वेगवेगळ्या भागांत झालेल्या नवीन रस्त्यांवर महापालिका आता पथदिवे बसविणार आहे. तब्बल साडेतीन हजार पथदिवे बसविण्याचे काम येत्या सहा महिन्यांत केले जाणार आहे. त्यामुळे नवीन रस्त्यांसह समाविष्ट गावांमधील रस्त्यांवरील अंधार दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शहरात समाविष्ट झालेल्या ३२ गावांमधील रस्त्यांसह सार्वजनिक ठिकाणांवर पथदिव्यांचा अभाव आहे. त्याबाबत संबंधित गावांमधील नागरिकांकडून महापालिका प्रशासनाकडे सातत्याने मागणी करूनही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नव्हती. ‘सकाळ’ने त्यावर प्रकाश टाकला, त्यानंतर महापालिकेकडून समाविष्ट गावांमधील रस्त्यांसह सार्वजनिक ठिकाणांवर पथदिवे बसविण्यासाठीची तांत्रिक प्रक्रिया सुरू केली आहे. समाविष्ट गावांसह शहराच्या वेगवेगळ्या भागांत झालेल्या नवीन रस्त्यांवरही महापालिका पथदिवे बसविले जाणार आहेत.
महापालिकेने समाविष्ट गावांसह शहरातील नवीन रस्त्यांवर पथदिवे बसविण्यासाठी २५ ते ३० कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकामध्ये केली आहे. त्यापैकी समाविष्ट गावांसाठी १८ कोटी रुपये तर, महापालिकेच्या वेगवेगळ्या भागांत झालेल्या नवीन रस्त्यांसाठी ७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या कामाच्या पहिल्या टप्प्यातील खर्चासाठी वित्तीय मान्यता मिळाली आहे, तर दुसऱ्या टप्प्यासाठी लागणारा खर्च मिळविण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. महापालिकेचा पथ विभाग येत्या सहा महिन्यांत संबंधित ठिकाणी साडेतीन हजार पथदिवे बसविणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांचे जीवन सुसह्य व सुरक्षित होण्यास चांगलीच मदत होणार आहे.
बोपदेव घाटातही पथदिवे
बोपदेव घाटामध्ये ऑक्टोबर २०२४ मध्ये मित्रासमवेत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. या घटनेने महाराष्ट्र हादरला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून पथदिवे बसविण्यात यावेत, अशी मागणी पोलिसांसह नागरिकांकडून करण्यात येत होती. त्यानुसार महापालिकेने ‘जी-२०’ परिषदेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर बसविलेले ३० पथदिवे काढून ते बोपदेव घाटाजवळील ट्रिनिटी शाळेपर्यंत महापालिकेच्या हद्दीत पथदिवे बसविले आहे.
समाविष्ट गावे व शहरातील नवीन रस्ते, अंधार असणारी ठिकाणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी ३५०० पथदिवे बसविले जाणार आहेत. त्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे. आगामी सहा महिन्यांत पथदिवे बसविण्याची कामे पूर्ण होतील.
- मनीषा शेकटकर,
प्रमुख, विद्युत विभाग, महापालिका
पथदिवे का महत्त्वाचे?
१) अपघाताच्या घटना कमी होण्यास मदत
२) विविध प्रकारच्या गुन्ह्यांसह गैरप्रकारांना आळा बसणार
३) चोरी, लूटमार, जबरी चोरीच्या घटनांवर नियंत्रणास फायदा
४) महिला, तरुणींसह नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण निर्मितीस उपयुक्त
अशी आहे तरतूद
२५ ते ३० कोटी रुपये
- पथदिवे बसविण्यासाठीची तरतूद
१८ कोटी रुपये
- समाविष्ट गावांमधील पथदिव्यांसाठी निधी
७ कोटी रुपये
- शहरातील नवीन रस्त्यांसाठी निधी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.