चित्तवृत्तींच्या स्थिरतेसाठी योगसूत्र महत्त्वाचे

चित्तवृत्तींच्या स्थिरतेसाठी योगसूत्र महत्त्वाचे

Published on

पुणे, ता. ७ ः ‘‘प्राचीन काळापासून आपण सत्याचा शोध घेत आहोत. त्या शोधाचा मार्ग आपल्याला योगातून मिळतो. योग केवळ शरीर आणि मेंदूपुरता मर्यादित नसून, तो सत्याचा शोध घेण्याचे प्रभावी माध्यम आहे. चित्तवृत्ती स्थिर करण्यासाठी योगसूत्रे महत्त्वाची ठरतात,’’ असे प्रतिपादन आध्यात्मिक, योग गुरू श्री एम यांनी आज केले.
‘सकाळ’ प्रस्तुत ‘सुहाना स्वास्थ्यम्’ महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात श्री एम यांच्या व्याख्यानाने झाली. त्यावेळी ते बोलत होते. ‘योग, उपनिषद अँड बियाँड’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. ‘सुहाना मसाले’ हे या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक असून, ‘विश्‍वकर्मा विद्यापीठ’ हे सहप्रायोजक आणि ‘भारती विद्यापीठ’ हे सहयोगी प्रायोजक आहेत.
श्री एम म्हणाले, ‘‘सत्याचा शोध हजारो वर्षांपासून सुरू आहे. आपल्या पूर्वजांनी बाह्य सत्याचा नाही तर अंतर्यामी सत्याचा शोध घेतला. त्यातूनच सहा दर्शनांचा जन्म झाला. दर्शनांना आपण तत्त्वज्ञान म्हणतो; पण ते तत्त्वज्ञान नाही. दर्शन या संकल्पनेचा अर्थ समोरासमोर भेट घेणे, असा आहे. म्हणून सत्याला सामोरे जाणे, अशा अर्थाने याला दर्शन म्हणतात. दर्शनांमधील न्याय दर्शनाचा संबंध तर्काशी आहे. वैशेषिक दर्शनात भौतिक दृष्टिकोनातून जगाचा शोध घेतला आहे. सांख्य दर्शनाची रचना महर्षी कपिल यांनी केली आहे. यात सर्वप्रथम ईश्‍वरीय संकल्पना मांडण्यात आली. सांख्य दर्शनानंतरचे दर्शन म्हणजे योग दर्शन. याची रचना महर्षी पतंजली यांनी केली. सांख्य दर्शनातील ईश्‍वरीय संकल्पना मान्य करताना त्यापुढे जात ईश्‍वराशी संवाद साधता येऊ शकतो, ईश्‍वराच्या चरणाशी संपूर्ण समर्पण करता येते, अशी संकल्पना योग दर्शनात मांडली आहे. योग दर्शनानंतर पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा अशी अन्य दोन दर्शने आहेत.’’
योग दर्शनाची संकल्पना विशद करताना श्री एम म्हणाले, ‘‘योग दर्शनाचा सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे महर्षी पतंजली यांचे योगसूत्र. यात त्यांनी ईश्‍वराच्या चरणी समर्पित होण्याची संकल्पना मांडली. ‘अथ योगानुशासनम्’, इथपासून योगाभ्यासाची सुरुवात होते. ‘योग चित्त वृत्ती निरोधः’ म्हणजे मनाच्या वृत्तींचा निरोध, अर्थात मनातील चंचल विचार थांबविणे. वृत्ती या सकारात्मक आणि नकारात्मकही असू शकतात. आपले मन अशांत असते, सतत विचारांनी प्रवाहित असते. मन शांत आहे, असा आपण विचार करतानाही मन काहीतरी विचार करतच असते. त्यामुळे योग हे मेंदूला, विचारांना शांत करण्याचे माध्यम आहे.’’
यावेळी ‘सुहाना मसाले’चे संचालक विशाल चोरडिया व श्‍वेता चोरडिया, ‘जॉय अँड क्रू व्हॅकेशन्स एलएलपी’च्या संस्थापक प्रग्या अधिराज, ‘चंदुकाका सराफ ज्वेल्स’चे संचालक सिद्धार्थ शहा या प्रायोजकांचा सत्कार करण्यात आला. चैतन्य राठी यांनी सूत्रसंचालन केले.

ॐकाराची व्याख्या
श्री एम म्हणाले, ‘‘मांडुक्य उपनिषदात ॐकाराची वेगळी व्याख्या सांगितली आहे. ‘आ’ म्हणजे जागृतावस्था, ‘उ’ म्हणजे स्वप्नावस्था आणि ‘म’ म्हणजे गाढ निद्रावस्था, अशा तीन अवस्था सांगितल्या आहेत. जागृतावस्था खरी आहे आणि स्वप्नावस्था हा भास आहे. पण जागृतावस्था हादेखील कदाचित भासच असू शकतो. त्यामुळे आपण ज्याला जागृतावस्था म्हणतो, ती नक्की जागृतावस्था आहे का, असा प्रश्‍न आहे. गाढ निद्रावस्थेत असताना आपल्याला त्याची जाणीव नसते. जागृतावस्थेत आल्यानंतर गाढ निद्रेची जाणीव होते. त्यानंतर येते ती अवस्था म्हणजे तुरीय.’’

...तर नालंदा विद्यापीठ पुन्हा उभारू
‘‘अमेरिकेत टॅरिफ वाढविल्यामुळे तिथे स्थायिक झालेले भारतीय परतत आहेत, याचा मला आनंदच आहे. त्यांनी तिथे पाहिलेली स्वप्ने भारतात पूर्ण करू शकतो. येथील स्रोतांचा वापर करून तुमच्यातील गुणवत्तेचा देशासाठी वापर करा, असे माझे तरुणांना आवाहन आहे. यातून अनेक सुंदर गोष्टी उभ्या राहतील. कदाचित एके दिवशी आपल्या एकत्रित प्रयत्नांतून नालंदा विद्यापीठदेखील पुन्हा उभे करता येईल’’, असा विश्‍वास श्री एम यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com