भारतीयांना ‘आरोग्य साक्षर’ बनविणे हेच ध्येय : रेवंत हिमत्सिंगका
पुणे, ता. ७ : ‘‘भारतात सुशिक्षित नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत, परंतु तितकेच आरोग्य साक्षरतेबाबत अज्ञान आहे. देशातील १४० कोटी भारतीयांचे आरोग्य निरोगी हवे असेल तर आपल्याला नागरिकांना ‘आरोग्य साक्षर’ बनवायला हवे. आरोग्य साक्षरता म्हणजे आरोग्य सेवा नव्हे, तर निरोगी आरोग्याबाबतचे शिक्षण आहे. त्यामुळे ‘आरोग्य साक्षरता’ हा विषय शालेय अभ्यासक्रमात आणायला हवा,’’ असे ‘फूड फार्मर’ रेवंत हिमत्सिंगका यांनी ठामपणे सांगितले. नागरिकांच्या निरोगी आरोग्याशी संबंधित असणारे ‘आरोग्य साक्षर’ हे अभियान जनचळवळ व्हायला हवे, त्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही रेवंत यांनी केले.
‘सकाळ’ प्रस्तुत ‘सुहाना स्वास्थ्यम्’ या महोत्सवांतर्गत कार्यक्रमात रेवंत यांनी आरोग्य साक्षरतेचे धडे दिले. भारतातील प्रत्येक नागरिकाला पुढील पाच वर्षांत आरोग्य साक्षर बनविण्याचे ध्येय असल्याचेही रेवंत यांनी यावेळी अधोरेखित केले. ते म्हणाले, ‘‘देशातील बहुतांश नागरिक पाकीटबंद खाद्यपदार्थ घेताना त्यावरील ‘एक्स्पायरी डेट’, ‘एमआरपी’ आणि ‘शाकाहारी/मांसाहारी हे पाहतात. लांबच्या तारखेची ‘एक्स्पायरी डेट’ असणारे पाकीट खरेदी करण्यावर नागरिकांचा भर असतो. परंतु, ‘एक्स्पायरी डेट’ जितकी लांबच्या तारखेची असते, तितका तो पाकीटबंद पदार्थ शरीरासाठी घातक असतो. बहुतांश नागरिक हे पाकीटबंद खाद्यपदार्थांच्या पुढच्या बाजूला लिहिलेले वाचून प्रभावित होतात. पण, नागरिकांनी पाकिटाच्या मागील बाजूला लिहिलेले घटक बारकाईने पाहणे गरजेचे आहे.’’
केंद्र सरकारच्या ‘जागो ग्राहक जागो’ यानंतरचे ग्राहकांना जागृत करणारे देशातील दुसरे मोठे उभे राहिलेले ‘लेबल पढेगा इंडिया’ अभियान, सीबीएसईच्या शाळांसह अन्य मंडळांच्या शाळा, सरकारी कार्यालयांत लावण्यात आलेले ‘शुगर बोर्ड’ या अभियानाची यशोगाथा रेवंत यांनी उलगडली. ‘‘आजच्या काळात पाकीटबंद खाद्यपदार्थांपासून पूर्णपणे दूर राहणे अवघड आहे. त्यामुळे त्यातल्या त्यात सुरक्षित आणि चांगले खाद्यपदार्थ लेबल वाचूनच खरेदी करा. नागरिक बारकाईने लेबल वाचून खाद्यपदार्थ खरेदी करू लागले, तर कंपन्यांना चांगले आणि दर्जेदार उत्पादन तयार करावेच लागेल,’’ असेही रेवंत यांनी नमूद केले.
‘आरोग्य क्रांती आणण्यासाठी खुलेपणाने बोलायला हवं’
‘‘मी जंकफूडच्या विरोधात नाही, परंतु जंक फूडचे मार्केटिंग चुकीच्या पद्धतीने होते, त्याला माझा विरोध आहे. जंकफूड हे तुमच्या दैनंदिन आहारात समाविष्ट करण्याचा छुपा डाव अप्रत्यक्षरीत्या जाहिरातींमधून थोपवला जातो आणि नकळतपणे ग्राहक त्याला भूलतात. अशा प्रकारे जंकफूडचे चुकीच्या पद्धतीने मार्केटिंग होत आहे. म्हणूनच भारतात आरोग्य क्रांती आणण्यासाठी खुलेपणाने बोलणे गरजेचे आहे,’’ असे रेवंत यांनी आवर्जून सांगितले.
हे लक्षात ठेवा
१. पाकिटाच्या पुढील बाजूला लिहिलेल्या शब्दाने प्रभावित होऊ नये
२. सर्वाधिक चांगल्या पदार्थांना कोणतेही ‘लेबल’ नसते (उदा. फळे, सुकामेवा, धान्य आदी)
३. साखर, मैदा हे घटक पहिल्या तीन घटकांमध्ये नसावेत
४. लेबल बारकाईने वाचा आणि मग पाकीटबंद खाद्यपदार्थ खरेदी करा
५. लांबची ‘एक्स्पायरी डेट’ तितका तो पदार्थ घातक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

