राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांवर ‘प्रगत’ नजर
प्रसाद कानडे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ३ : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेही आता पुणे-सातारा, पुणे-सोलापूर व पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर प्रगत वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (अॅडव्हान्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम- एटीएमएस) कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव देखील रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाला पाठविला आहे. वाढते अपघात व वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे.
पुणे-सातारा, पुणे-सोलापूर व पुणे-नाशिक मार्गावरून धावणाऱ्या वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. परिणामी अपघात व वाहतूक कोंडीचा फटका वाहनचालकांना बसत आहे. हे लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या तिन्ही मार्गांवर ‘एटीएमएस’ प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात एक किलोमीटरच्या अंतरावर एक सीसीटीव्ही कॅमेरा बसविला जाणार आहे. याशिवाय महामार्गावर असणाऱ्या दिशादर्शक फलकांवर (ग्रँटिज) कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे वेगाने धावणारे, मार्गिका तोडणारे, रस्त्याच्या बाजूला बेकायदेशीररीत्या थांबणाऱ्या वाहनांवर सहजरित्या कारवाई करता येणार आहे. तिन्ही मार्ग मिळून सुमारे ५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
अशी होणार कारवाई...
- महामार्गावर ठिकठिकाणी लावलेले कॅमेरे हे अत्याधुनिक पद्धतीचे आहेत. त्यामुळे वाहन, नंबर प्लेट्स व वेगाची नोंद सहजरित्या होणार
- वाहनांची नंबर प्लेट स्कॅन करून संबंधित मालकाला ई-नोटीस पाठविली जाणार
- वेगाचे मोजमाप करणाऱ्या यंत्रणेमुळे निर्धारित वेगाहून अधिक वेग असल्यास वाहनांवर कारवाई होणार
- ‘एआय’चा वापर केल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन, क्षमतेपेक्षा अधिक भार, मार्गिकांचा चुकीचा वापर, सीट बेल्ट लावलेले नसेल अथवा दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले नसेल तर कारवाई होणार
- वाहतूक नियमांच्या उल्लंघनाची माहिती आणि दंडाची नोटीस संबंधित वाहनमालकाच्या मोबाईलवर पाठवली जाणार
३६० डिग्री फिरणारे कॅमेरे
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुण्याच्या बाजूने असणाऱ्या तिन्ही महामार्गांवर एटीएमएस प्रणाली सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दर पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या दिशादर्शक फलकांवर कॅमेरे लावले जाणार आहेत. प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरा बसविणार आहे. हे कॅमेरे ३६० डिग्री फिरणारे असून ते ५०० मीटर अंतरावरील चित्रण करू शकतील. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या मार्गिकांवरही त्यांचे लक्ष राहणार आहे.
‘एटीएमएस’चे फायदे...
१) प्रगत प्रणालीमुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार. चालू स्थितीतील वाहतुकीची माहितीही मिळणार. परिणामी मार्गांचे नियोजन करून वाहतूक कोंडी कमी होणार.
२) अपघातांचे प्रमाण कमी होणार
३) वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहणार
४) प्रमाणित आणि पुराव्यावर आधारित दंड आकारणार
५) वाहनांची माहिती वेळेनुसार मिळणार
६) वाहतूक कोंडी कमी झाल्याने इंधनाची बचत व प्रदूषणात घट होणार
७) वाहतूक धोरण, मार्गांचे नियोजन, नवीन उड्डाणपूल अथवा सेवा रस्त्यांचे नियोजन करता येणार
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुण्याशी जोडणाऱ्या तिन्ही महामार्गांवर एटीएमएस प्रणाली सुरु केली जाणार आहे. तसा प्रस्ताव रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाला पाठविण्यात आला आहे. मंजुरी मिळताच काम सुरु केले जाईल.
- संजय कदम,
प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.