शक्तीपीठ महामार्ग बदलण्यास पंढरपुरातील शेतकर्यांचा विरोध

शक्तीपीठ महामार्ग बदलण्यास पंढरपुरातील शेतकर्यांचा विरोध
Published on

UPR25B07176
पंढरपूर : शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ बैठकीत सहभागी झालेले आमदार राजू खरे, बाबासाहेब देशमुख, प्रशांत परिचारक, विजयसिंह देशमुख व शेतकरी.
---
शक्तिपीठ महामार्ग बदलण्यास शेतकऱ्यांचा विरोध
पूर्वीच्या रेखांकानुसारच महामार्ग तयार करण्याची मोहोळ, पंढरपूर, सांगोल्यातून मागणी
सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. २६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग बदलण्यास पंढरपूर, सांगोला, मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. पूर्वीच्या रेखांकानुसारच हा महामार्ग तयार करावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी आज (शुक्रवारी) केली आहे.
शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ या भागातील शेतकऱ्यांनी एकजूट दाखवली आहे. दरम्यान, सरकारने जो महामार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे तो योग्यच आहे. सरकारच्या या नव्या निर्णयामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे भाजपचे किसान मोर्चाचे सरचिटणीस माऊली हळणवर यांनी सांगितले.
हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्गात सोलापूरपासून बदल करण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता या मोहोळ, पंढरपूर, सांगोला, आटपाडी भागातील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध नसल्याचे सांगत, आमच्या जमिनी द्यायला तयार असल्याचे सांगितले.
शक्तिपीठ महामार्ग समर्थनार्थ शुक्रवारी (ता. २६) पंढरपुरात शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्ग बदलण्यास विरोध केला आहे. बैठकीला आमदार राजू खरे, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, पंचायत समितीचे माजी उपसभापती विजयसिंह देशमुख, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष मस्के, शेकापचे नेते अनिकेत देशमुख आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रशांत परिचारक म्हणाले, की शक्तिपीठ महामार्गामुळे सोलापूर जिल्ह्यातील विकासाला चालना मिळणार आहे. शक्तिपीठ महामार्ग मंजूर झाल्यानंतर मी स्वतः या भागातील अनेक शेतकऱ्यांना विरोधी भूमिका घेऊ नका, असे सांगितले होते. त्यानंतर या भागातील शेतकऱ्यांनी सरकारला सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती. परंतु, अचानक सरकारने पंढरपूर, सांगोला, मोहोळ या भागातून महामार्ग बदलून तो माढा, माण, खटाव या भागातून नेण्याचा विचार सुरू आहे. पूर्वीप्रमाणेच हा महामार्ग व्हावा, अशी आमची मागणी आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस नक्कीच आमच्या मागणीचा विचार करून पूर्वीप्रमाणेच हा महामार्ग करण्यास मान्यता देतील, असा आमचा ठाम विश्वास आहे. शेतकऱ्यांनी सरकारच्या चांगल्या प्रकल्पांना सहकार्य करावे, असे आवाहनही परिचारक यांनी केले.
बैठकीनंतर शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयावर हलगीनाद मोर्चा काढून प्रांताधिकारी सचिन इथापे यांना निवेदनही दिले.
...
कोट
शक्तिपीठ महामार्गामध्ये माझी स्वतःची चार एकर शेती व एक विहीर जाणार आहे. मी स्वतः या महामार्गासाठी माझी शेती द्यायला तयार आहे. माझ्या शेतातून शक्तिपीठ महामार्ग जाणार असल्याने माझी शेती तीन वर्षांपासून पडीक आहे. मात्र, सध्या सरकारने महामार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या निर्णयामुळे आमचे मोठे नुकसान होणार आहे. सरकारने पूर्वीप्रमाणेच महामार्ग तयार करावा; अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू.
- विनायक कुलकर्णी, शेतकरी, मांजरी, ता. सांगोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com