पुणे - घोरपडी येथील उड्डाणपुलाच्या खांबासाठी खोदलेल्या खड्ड्यात नऊ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यु झाला. मात्र खड्ड्याभोवती पत्र्याचे बॅरीकेडींग, मातीचा उंच ढिगारा व सुरक्षा रक्षक ठेवत सुरक्षिततेच्यादृष्टीने खबरदारीच्या उपाययोजना केल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र पत्र्याचे बॅरीकेडींग व सुरक्षा रक्षक असतानाही मुलगा तिथे गेलाच कसा? मुलाच्या मृत्युची घटना घडलीच कशी? असे प्रश्न उपस्थित होऊन मुलाच्या मृत्युबाबतचा संशय वाढला आहे.
महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाकडुन घोरपडी येथील लोहमार्गावरील उड्डाणपुलाचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. उड्डाणपुलाचा खांब उभारण्यासाठी साईबाबा मंदिराच्या पाठीमागील बाजुस ठेकेदाराकडून खड्डा खोदण्यात आला आहे. मात्र खड्डा खोदताना मलवाहिनीचा पाईप फुटल्याने खड्ड्यात दूषित पाणी भरल्याने काम बंद करण्यात आले होते.
दरम्यान, २९ मार्च रोजी क्रिश सुभाष अंगरकर (वय-९, रा. खान रोड, रेसकोर्सजवळ) या मुलाचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यु झाल्याचे उघडकीस आले. महापालिकेच्या विशेष विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजीत आंबेकर व त्यांच्या अधिकाऱ्यांनी २९ मार्च रोजी रात्री व मंगळवारी (ता.१) अशी दोन वेळा घटनास्थळाची पाहणी केली.
'खड्ड्याच्या कामाभोवती पत्र्याचे बॅरीकेडींग, एका बाजुला मातीचा उंच ढिगारा व सुरक्षा रक्षक नेमणुकीस होता, असा दावा महापालिकेने केला आहे. सुरक्षा रक्षक, ठेकेदाराचे कामगार यांच्याव्यतिरीक्त तिथे कोणी जात नाही' असे स्पष्ट करत महापालिकेने बाजु सावरण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रत्यक्षात पत्र्याच्या बॅरीकेडींगमधुन लहान मुले आतमध्ये सहज जाऊ शकतील, अशी निमुळती जागा तेथे होती, तसेच घटना घडलेल्या खड्ड्यापासूनच काही अंतरावर नैसर्गिक पाण्याचा झरा असलेला खड्डा आहे, तेथे लहान मुले पोहण्यासाठी जातात ही सद्यःस्थिती असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. खड्ड्याचे काम बंद असेल, त्यावेळी सुरक्षा रक्षक तेथे उपस्थित राहात नाही.
२७ व २८ मार्च रोजी तेथे काम बंद होते, त्यावेळी सुरक्षा रक्षक तेथे नव्हता, असाही आरोप स्थानिकांनी केला आहे. दरम्यान, ही घटना नेमकी कशी घडली ? मुलगा एकटाच त्या ठिकाणी कसा व का गेला ? सुरक्षा रक्षक ड्युटीवर होता, तर त्याने मुलाला खड्ड्याकडे जाण्यापासुन रोखले का नाही? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या घटनेचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.
'घोरपडी उड्डाणपुलाच्या खांबासाठी घेतलेल्या खड्ड्याभोवती पत्र्याचे बॅरीकेडींग, सुरक्षा रक्षक अशा उपाययोजना केल्या आहेत. तरीही, तिथे मुलगा कसा पोहोचला असा प्रश्न आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. तरीही, मुलाच्या कुटुंबीयांना आधार देण्याचा काम महापालिकेकडुन केले जात आहे.'
- युवराज देशमुख, मुख्य अभियंता, विशेष प्रकल्प महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.