पुणे : राज्यातील वंचित, शोषितांना ताकद देण्यासाठी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वाभूमीवर स्थापन केलेली "वंचित बहुजन आघाडी' आता सलाईनवर येणार असल्याचे चित्र आहे. पक्षातील विश्वावसार्हता संपल्याचे कारण देत वंचित आघाडीच्या राज्यातील सुमारे 50 पदाधिका-यांनी आपल्या पदाचा शनिवारी राजीनामा दिला आहे.
राजीनामा दिलेल्यांमध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळालेल्यांचा देखील समावेश आहे. माजी आमदार हरिदास भदे, बळिराम सिरस्कार, राज्याचे महासचिव नवनाथ पडळकर, देखरेख समिती प्रमुख अर्जुन सलगर यांच्यासह अनेक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, संपर्क प्रमुख, महासचिव, सल्लागार, जिल्हा संघटक, कार्याध्यक्ष, युवा तालुका अध्यक्ष यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे राजीनामे सादर केले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत तिसरी आघाडी म्हणून पुढे आलेल्या वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची युती विधानसभेच्या तोंडावर तुटली होती. तसेच आघाडीतील ज्येष्ठ नेते लक्ष्मण माने यांनी देखील वेगळी चूल मांडली होती. आघाडीतून बाहेर पडलेल्या माने यांनी महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी नावाचा पक्ष स्थापन केला होता.
त्यानंतरही वंचित आघाडीतील गळती सुरूच होती. मात्र आता सुमारे 50 पदाधिका-यांनी एकाच वेळी राजीनामे सादर केल्याने वंचित आघाडीला मोठे भगदाड पडले आहे. राजीनामा दिलेल्या सर्व पदाधिका-यांची येत्या काही दिवसांत बैठक होणार आहे. त्यानंतर ते पुढील भूमिका ठरविणार असल्याचे राजीनामा दिलेले पक्षाचे राज्य महासचिव नवनाथ पडळकर यांनी सांगितले.
समाजातील वंचित व शोषित घटकाला सत्तेत आणण्याच्या मुख्य उद्देशाने "वंचित बहुजन आघाडी'ची स्थापना करण्यात आली होती. मात्र सध्या पक्षाचे ज्या पद्धतीने कामकाज सुरू आहे, त्यावरून असे वाटत नाही की वंचित-शोषित सत्तेत येतील. तसेच पक्षातील विश्वा सार्हता देखील संपली आहे. त्यामुळे आम्ही राजीनामे देत आहोत. बैठक घेऊन पुढील भूमिका ठरविण्यात येईल.
- नवनाथ पडळकर, राज्य महासचिव, वंचित बहुजन आघाडी
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.