Pune : समस्या ग्लोबल पण उपाय लोकलच

ज्येष्ठ जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह, ‘तेर पॉलिसी सेंटर’ आणि ‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटी’ च्यावतीने जन सुनावणीचे आयोजन
pune
punesakal

पुणे : ‘‘दुष्काळ आणि पूर अशा दुहेरी संकटांचा सामना आपल्याला करावा लागत आहे. पूर्वी बिहार, बंगाल आणि ओरिसा येथेच पूर येत होते. आता ११ राज्यात पूरपरिस्थिती निर्माण होते. सर्व नैसर्गिक संपदेचे केंद्रीकरण करण्याच्या हव्यासाने हवामान बदल घडून येत आहे. जगभरात हीच समस्या आहे. पर्यावरणीय समस्या ग्लोबल असल्या तरी त्याचे उपाय लोकलच आहेत,’’ असे मत ज्येष्ठ जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.

दुष्काळ आणि पुराच्या परिणामांवर ‘तेर पॉलिसी सेंटर’ आणि ‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जन सुनावणीत सिंह यांनी मार्गदर्शन केले. पुण्यात पार पडलेली ही पहिलीच सुनावणी होती. येत्या काळात जगभर हा उपक्रम राबवला जाणार आहे. एमआयटीमधील चाणक्य हॉलमध्ये मंगळवारी (ता. ४) पार पडलेल्या या सुनावणीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, ‘सकाळ’चे संपादक-संचालक श्रीराम पवार, समुद्र आणि पर्यावरणाचे अभ्यासक डॉ. सुनील मुरलीधर शास्त्री, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते सारंग यादवाडकर, जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे, युक्रेन विद्यापीठाच्या इरिना आणि ‘तेर पॉलिसी सेंटर’च्या संस्थापक-संचालक डॉ. विनिता आपटे सहभागी झाले होते.

डॉ. करमळकर म्हणाले, ‘‘पर्यावरणीय बदलांमुळे लेह-लडाखमधील हीम नद्या नष्ट झाल्या आहेत. चुकीच्या नियोजनामुळे नैसर्गिक अर्थव्यवस्था आपण बदलत आहोत. पर्यावरणीय समस्या दूर करणे ही एक जनचळवळ झाली आहे. केवळ चर्चा करून हे प्रश्‍न सुटणार नाहीत.

पवार म्हणाले, ‘‘विकासाच्या नावाखाली आपण पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बंद केले आहेत. पर्यावरणास बाधक असलेले प्रकार थांबविण्यासाठी योग्य प्रशासकीय नियोजन हवे. समाजाने या नियोजनाच्या मागे उभे राहिले पाहिजे. पर्यावरणाबाबत काम केले नाहीतर मत मिळणार नाहीत हे समजले तर राजकीय नेते प्राधान्याने ही कामे करतील. स्थानिक पातळीवर छोटे-छोटे प्रयत्न केले तरी भविष्यात मोठे बदल होतील.

यादवाडकर म्हणाले, ‘‘दुष्काळ आणि पूर हे मोठ्या नैसर्गिक विध्वंसाचे लक्षणे आहेत. हे सर्व थांबवण्यासाठी आपल्याला या समस्यांच्या मुळाशी जावे लागेल. चुकीचा विकास हे या मागील सर्वात मोठे कारण आहे. छोट्या शहरांचा देखील विकास झाला तर बड्या शहरातील नागरिकरण थांबेल.’’

डॉ. शास्त्री म्हणाले, ‘‘खोदकाम आणि झाडे कापल्याशिवाय आपला विकास होत नाही या विचारांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. हे सर्व टाळण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजे. पाण्याचा तुटवडा सर्वत्र आहे. मात्र असे असतानाही आपल्याला निसर्गातून दरवर्षी चांगले आणि भरपूर पाणी मिळत आहे.’’

पुरंदरे म्हणाले, ‘‘ समाजात काहीही बदल करायचे असेल तर त्यासाठी काही नियम व नियोजन लागते. नदीचे नियोजन कोणी व कसे करावे यासाठी कायदे असूनही त्याची अंमलबजावणी नाही. तसेच सुरू केलेल्या कामाची देखभाल देखील घेतली जात नाही. इरिना यांनी जागतिक पातळीवर एकत्रित पर्यावरण संवर्धनाच्या प्रयत्नांवर भर दिला. जीवितनदीच्या शैलजा देशपांडे यांनी पुण्यातील पुराची समस्या आणि त्यावरील उपाय यावर सादरीकरण केले. प्रस्ताविक डॉ. आपटे यांनी केले. स्नेहा भोसले यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com