एक नंबर! मोरेबागमध्ये "#WeCareForPune'चा नारा 

pune.jpg
pune.jpg

कात्रज (पुणे)  : बीआरटी आणि त्यापाठोपाठ रखडलेले पुनर्विकासाचे काम, प्रलंबित असलेले कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गाचे रुंदीकरण, कोंडीत अडकलेला कात्रज चौक, विकास आराखड्यातील रखडलेले रस्ते आणि त्यामुळे वाहतूक कोंडीने गुदमरलेल्या भारती विद्यापीठ परिसरातील चौक या समस्यांचा सातत्याने सामना करणाऱ्या मोरेबाग परिसरातील पंधरा सोसायट्यांतील पदाधिकाऱ्यांनी 'सकाळ संवाद' मध्ये सहभागी होत आपल्या समस्या मांडल्या. डिजिटल तंत्रज्ञानात अग्रेसर असलेल्या 'सकाळ'ने शेवटच्या घटकांपर्यंत पोचून संवाद साधण्याचा केलेला प्रयत्न लोकाभिमुख ठरणार असल्याची भावना सभासदांनी व्यक्त करतानाच 'वुई केअर फॉर पुणे'चा नारा दिला. 

कात्रज येथील मोरेबाग परिसरातील पंधरा सोसायट्यांतील सभासदांनी आज दैनिक "सकाळ'च्या "सकाळ संवाद' उपक्रमांतर्गत संवाद साधला. सावंत विहार फेज एक, दोन व तीन, सिक्‍स्थ सेंन्स, सांवत गार्डन, आगम दर्शन, माणिक मोती, अजिंक्‍य समृद्धी, सनशाइन यासह अनेक सोसायट्यांच्या पदाधिकारी व सभासदांनी या उपक्रमात सहभाही होऊन आपल्या समस्या, सूचना "सकाळ'कडे मांडल्या. 
 

बीआरटी मार्ग थंड का? 
या सोसायटी समूहाभोवती चारी दिशांना वाहतूक समस्या गंभीर होत आहे. त्यातही दोन रस्ते महापालिकेने वाहतूकमुक्त ठेवले आहेत याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे. बीआरटीच्या पुनर्विकासाचे काम ठप्प आहे. बीआरटीतून बस वाहतूक बंद झाली आहे. नागरी मार्गात प्रचंड धोकादायक स्थिती निर्माण होत आहे. बीआरटीचा पुनर्विकास 
होऊन बस धावायला होणारा विलंब संतापजनक आहे, असे नागरिक विनायक महांगडे यांनी सांगितले. 


"सकाळ संवाद' उपक्रमात सहभागी होऊन नागरिकांनी "वुई केअर फॉर पुणे'चा नारा दिला. 


''झपाट्याने वाढलेल्या नागरिकरणामुळे या परिसरातील सोसायटी समूहाभोवती अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. एमएनजीएलसाठी खोदाई होताना नागरिकांनी प्रचंड त्रास सहन केला आहे; परंतु सोसायट्यांना गॅस मिळालेला नाही. महिलांसाठी स्वतंत्र बसची संख्या वाढवली पाहिजे, ही मागणी सातत्याने करूनही कोणीच दखल घेत नाही.''
- ​ज्योती ढमाळ (आगम दर्शन सोसायटी) 

 "भूमिगत वीजवाहिन्यांची कामे अनेक ठिकाणी झाली आहेत. त्यानंतर जुने विजेचे खांब आणि तारा काढण्याचे काम आजपर्यंत झालेले नाही. परिणामी त्यालगतच्या झाडांची वाढ खुंटली आहे. दिरंगाईचा फटका सर्वसामान्यांना बसतोच आहे, त्याचवेळी वृक्षवाढीवर परिणाम होतोय. त्यासाठी निरुपयोगी सांगाडे काढून वाहतुकीला होणारी अडचण दूर करावी." 
- राजेंद्र घाटगे, (सनशाइन सोसायटी)

 कात्रज चौकालगतच्या या सोसायट्यांभोवताली अनेक जटील समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी "सकाळ' सतत पाठपुरावा करत आहे. पाठोपाठ "सकाळ संवाद' ऍप या काळात प्रभावी ठरत आहे. प्राणिसंग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांची संख्या सतत वाढत आहे. वर्षाकाठी अठरा ते वीस लाख पर्यटक प्राणिसंग्रहालय पाहाण्यासाठी येतात. त्यांना बहुमजली पार्किंगची व्यवस्था देण्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. 
- अनंत शिर्के (सावंत गार्डन सोसायटी)

''मोरेबाग परिसरातील एसटी महामंडळाच्या बसथांब्यालगत उभारलेले स्वच्छतागृह नागरिकांसाठी खुले करणे आवश्‍यक आहे. चारशे एसटी बस दिवसभरात थांबतात. तब्बल पाच हजार प्रवाशांचा विचार करून स्वच्छतागृह तत्काळ सुरू करणे आवश्‍यक आहे.''
- रघुनाथ कड (सावंत विहार फेज दोन)

''बाह्यवळण मार्ग आणि सातारा रस्ता प्रचंड वाहतुकीने ओसांडून वाहत आहेत. त्याचवेळी भारती विद्यापीठ परिसरातील अंतर्गत रस्ते आणि चौक वाहतूक कोंडीने व्यापून गेले आहेत. पर्यायी रस्ते निर्माण करणे आवश्‍यक आहे. विकास आराखड्यातील रस्ते रखडून ठेवून नागरिकांना वेठीस धरले जात आहे. ''
- समताराजे शिंदे

 ''या पंधरा सोसायट्यांना सातारा रस्त्याकडून आत येण्यासाठी असलेला एकमेव मार्ग धोकादायक ठरत आहे. सातारा रस्ता बीआरटी मार्ग वाहतुकीने व्यापून गेला आहे. त्याला भेदून सोसायटीकडे वळणे जिकीरीचे ठरत आहे. तेथे पाथ वे आणि सिग्नलची उभारणी आवश्‍यक आहे.''
- पंकज शहा (सावंत विहार फेज दोन)

''सार्वजनिक विकास होत असताना सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालये आणि अभ्यसिकांची व्यवस्था करणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भवितव्य घडवण्यासाठी झटणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. त्यांना स्वस्त आणि सोईस्कर अभ्यासिका देणे ही जबाबदारी आहे. आगम दर्शन सोसायटीलगत आरक्षित जागेत अभ्यासिका उभारल्यास या परिसरातील विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होईल. अंतर्गत रस्त्यावर बेकायदा पार्किंगवर कारावाई व्हावी.''
- भरगुडे 

''कमी उंचीचा आणि अरुंद दत्तनगरचा भुयारी मार्ग गेली अनेक वर्षे वाहतूक कोंडीचे केंद्र ठरत आहे. बाह्यवळण मार्गाचे रखडलेले रुंदीकरण परिणामी होणारी वाहतूक कोंडी सर्वसामान्यासाठी प्रचंड त्रासदायक ठरत आहे.''
-  संजय काकडे (शत्रुंजय सोसायटी)

सातारा रस्ता पुनर्विकासात पार्किंगच्या जागेत फळविक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. अनेक टुर्स ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बस गॅरेजवाल्यांची वाहने रस्त्यावरचा ताबा सोडण्यास तयार नाहीत. दंडात्मक कारवाया सातत्याने होणे आवश्‍यक आहेत. 
- बबन भोसले (सावंत गार्डन)

''लोकसंख्या वाढत असताना त्या वेगाने विकास करण्यात महापालिका अपयशी ठरली आहे.''
- अतीष जाधव (श्रीराम दर्शन)

''बीआरटीचा पुनर्विकास, उत्तरेकडे डेअरी चौकातील वाहतूक समस्या आणि कचरा रॅम्पची दुर्गंधी, पश्‍चिमेकडे वाहतुकीने कोंडलेले अंतर्गत रस्ते, दक्षिणेकडे बाह्यवळण मार्गाचे रखडलेले रुंदीकरण आणि कात्रज चौकातील कोंडी या अवाढव्य समस्या प्रलंबित आहेत. कात्रज डेअरीच्या धुराड्यातून बाहेर पडणारा धूर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण करत आहे. धुरातून पसरणारी भुकटी श्वसनाचे विकार वाढवत आहे. कात्रज डेअरी ही या भागाची ओळख आहे. परंतु आधुनिक तंत्रज्ञान वापरून हवेत सोडला जाणारा धूर बंद करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे.''
- दिलीप जगताप (सावंत विहार)

''लोकसंख्या वाढत असताना त्या वेगाने विकास करण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. कचरा रॅम्प परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून आधुनिक तंत्राच्या वापराने परिसर दुर्गंधीमुक्त केला पाहिजे.''
- अतीष जाधव (श्रीराम दर्शन)

''सातारा रस्ता बीआरटी मार्गावरील या सोसायटी समूहात तब्बल पंधरा हजार नागरिक राहतात. त्यांना त्यांच्या राहत्या घराकडे येण्यासाठी सुरक्षित मार्ग देणे आवश्‍यक आहे. जीव मुठीत घेऊन दररोज जगणे हे स्मार्ट सिटीच्या उद्देशाला शोभनीय नाही.''
स्वाती पवार (सावंत विहार)

''कात्रज, धनकवडी, आंबेगावचा काही भाग महापालिकेत जाऊन बावीस वर्षे झाली तरीही या परिसरातील समस्या कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. क्षेत्रीय कार्यालयांना जादा अधिकार देऊन परिसरातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे''
- शुभम बरदाडे (विद्यार्थी)

''अंतर्गत रस्त्यालगत खासगी वाहनांनी घेतलेला ताबा रस्त्यांची रुंदी कमी करत आहेत. रुंदीकरण कोणासाठी हा प्रश्न आहे. बेजबाबदार पार्किंगवर कारवाई व्हावी.''
- सुरेश लाडे

''
प्रवाशी संख्या सामावण्यासाठी तीन हजार बस उपलब्ध व्हाव्यात, त्यात महिलांसाठी स्वतंत्र एक हजार बस दिल्या पाहिजेत. लहान मुलांना कडेवर घेऊन बस पकडणाऱ्या महिलांचा विचार पीएमपीएल आणि महापालिकेने करावा. ''
- रामलाल उणेचा
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com