

Fixed Income Investment Options
esakal
प्रियांका कुलकर्णी- priyankakulkarni2201@gmail.com
भारतातील गुंतवणूक संस्कृती गेल्या दशकात झपाट्याने बदलली आहे. शेअर बाजारातील वाढ, म्युच्युअल फंडांमध्ये वाढलेला सहभाग आणि डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे गुंतवणूक अधिक सुलभ झाली आहे. मात्र, शेअर बाजार जसा विकसित झाला आहे, तितका रोखे (बॉँड-Bond) बाजार अजूनही सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी अपरिचित राहिला आहे. अलीकडील धोरणात्मक चर्चांमध्ये आणि अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये रोखे बाजार बळकट करण्यावर दिलेला भर विशेष लक्षवेधी ठरतो. या पार्श्वभूमीवर रोखे म्हणजे काय, त्यांचे महत्त्व काय आणि भारतातील रोखे बाजार सध्या चर्चेत का आहे, हे समजून घेणे आवश्यक ठरते.
रोख म्हणजे कर्जाचा औपचारिक करार. जेव्हा सरकार किंवा एखादी कंपनी निधी उभारण्यासाठी लोकांकडून किंवा संस्थांकडून कर्ज घेते, तेव्हा ते ठराविक व्याजदराने आणि ठराविक कालावधीत परतफेड करण्याचे आश्वासन देते. या कराराला ‘रोखा’ असे म्हणतात. उदा. भारत सरकार जेव्हा सरकारी रोखे जारी करते, तेव्हा गुंतवणूकदार सरकारला कर्ज देतो. सरकार दरवर्षी ठराविक व्याज देते आणि मुदत पूर्ण झाल्यावर मूळ रक्कम परत करते. म्हणजेच, रोखे खरेदी करणे म्हणजे कर्ज देणे होय.