

Indian Stock Market
esakal
भूषण महाजन - kreatwealth@gmail.com
आपल्या शेअर बाजाराची अवस्था ‘मुगल-ए-आझम’मधील अनारकली-मधुबालासारखी झाली आहे. बादशहा म्हणतो, ‘‘हम तुम्हे जिने नही देंगे और सलीम तुम्हे मरने नही देगा.’’ शेअर बाजाराने उत्साहाने उसळी मारली, की लगेच परदेशी वित्तीय संस्था विक्री करायला येतात आणि बाजार खाली आला ही संधी मानून आपले गुंतवणूकदार म्युचुअल फंड खरेदी करतात. संधी असेलच तर ती फक्त धाडस करणाऱ्यांनाच व तीही ‘स्टॉपलॉस’ मनात ठेवूनच!
संपूर्ण मे महिना शेअर यथातथाच गेला. खरा मार शुक्रवारच्या (२९ मे) शेवटच्या ३० मिनिटांत बसला. निमित्त होते ‘एमएससीआय’च्या निर्देशांकात अंतर्भूत शेअरची पुनर्रचना! या ‘रीजिग’मुळे फेडरल बँक, एमसीएक्स, नाल्को व इंडियन बँक या शेअरमध्ये जवळपास १३ हजार कोटी रुपयांची खरेदी अपेक्षित होती. त्याचबरोबर ह्युंदाई मोटर्स, जुबिलंट फुड्स, कल्याण ज्वेलर्स, रेल विकास निगम हे शेअर निर्देशांकाच्या बाहेर पडणार होते. त्यात ६८२० कोटी रुपयांची विक्री होणार होती. त्याशिवाय लार्ज कॅप शेअरची मोठी विक्री झाली आणि शेवटच्या तासाभरात ‘सेन्सेक्स’ १००० अंशांनी आणि एकूण १५०० अंशांनी खाली आला. ‘निफ्टी’ आपल्या आधारपातळीजवळ येऊन २३,५४७ अंशांवर थांबला. शेवटच्या तासाभरात असे का व्हावे, यात न शिरता आपण निष्कर्ष काढू शकतो, की भारतीय शेअर बाजाराचा निरुत्साह टिकून आहे.