

विक्रम अवसरीकर
vikram.awsarikar@gmail.com
दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेत काय-काय करावे, याचा विचार करत छोटू पायावर पाय टाकून बसला होता.
धनंजयराव नेहमीप्रमाणे कुठल्यातरी पुस्तकात डोके खुपसून बसले होते आणि स्वतःशीच काहीतरी बोलत होते.
‘‘काय चाललंय काय?’’ छोटूने शेवटी न राहवून विचारले.
‘‘काय करणार? डोक्यात काही नसले, की दुसरे काय करतात याचा चोंबडेपणा, तर मी नक्कीच करत नाहीये,’’ धनंजयरावांनी तिरकसपणे उत्तर दिले.
‘‘शेअर बाजार पडत आहे, आपण दिवाळीची सुट्टी घेतली आहे, कुठे जायचे काही ठरवले नाही, अशा परिस्थितीत काय करावे? असा विचार करणे म्हणजे नीट योजना आखणे असे म्हणतात.’’ छोटूने सडेतोड प्रत्युत्तर दिले.
‘‘आपण कुठं जाणार नाही, हे मान्य; पण याचा अर्थ असा नाही, की काहीच न करता बसायचे आणि योजना आखत आहे म्हणायचे. कोणाला माहित खरे काय चालले आहे?’’ धनंजयरावांनी आपला नेहमीचा उद्योग चालू केला.