

Rajesh Exports SEBI Probe
esakal
कौस्तुभ केळकर - kmkelkar@rediffmail.com
भांडवल बाजार नियामक ‘सेबी’च्या चौकशीमुळे सध्या चर्चेत आलेले राजेश एक्स्पोर्ट्स प्रकरण भारतीय भांडवली बाजारासाठी धोक्याची घंटा मानले जात आहे. तब्बल १५.१५ लाख कोटी रुपयांच्या कथित महसुलातील तफावत, परदेशातील उपकंपन्यांमधील व्यवहार, निधी वळवल्याचे आरोप आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या भूमिकेवर निर्माण झालेले प्रश्न... यांमुळे हे प्रकरण केवळ एका कंपनीपुरते मर्यादित राहिलेले नाही. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात एका भागधारकाने विचारलेल्या प्रश्नातून झाली, ही बाब अधिक लक्षवेधी ठरते. या संपूर्ण प्रकरणाचा घेतलेला वेध...
भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात अनेक मोठी आर्थिक प्रकरणे समोर आली आहेत. काही प्रकरणांमध्ये कंपन्यांनी कर्ज लपवले, काहींनी नफा फुगवून दाखवला, तर काहींवर गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचे आरोप झाले. मात्र, अलीकडे समोर आलेले राजेश एक्स्पोर्ट्सचे प्रकरण अनेक कारणांनी वेगळे आणि धक्कादायक मानले जात आहे. कारण येथे प्रश्न केवळ एका कंपनीच्या आर्थिक अहवालांचा नाही; तर तब्बल १५.१५ लाख कोटी रुपयांच्या कथित महसुलाचा, परदेशातील उपकंपन्यांच्या व्यवहारांचा, कंपनीच्या निधीच्या वापराचा, लेखापरीक्षण प्रक्रियेच्या विश्वासार्हतेचा आणि लाखो गुंतवणूकदारांच्या पैशांचा आहे. हे सर्व मुद्दे लक्षात घेतले, तर या प्रकरणाचे गांभीर्य स्पष्ट होते. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात कोणत्याही सरकारी चौकशीमुळे किंवा ‘व्हिसलब्लोअर’च्या आरोपांमुळे न होता, एका भागधारकाच्या तक्रारीतून झाली.