Retirement Planning:सेवानिवृत्तीनंतर नक्की किती पैसा हवा?
पैसा कमवणं, त्याची बचत करणं, हे तर सर्वचजण करीत असतात. मात्र आपण बचत केलेला, साठवलेला पैसा नेमका कुठं गुंतवावा, याचं ज्ञान सर्वांनाच असतं असं नाही. त्यामुळे आजच्या काळात आर्थिक नियोजनकारांचा सल्ला पैसे गुंतवण्यासाठी घेतला जातो. अर्थात पैसे गुंतवले तरच ते वाढतील आणि आपल्या कष्टाच्या पैशाची वाढ व्हावी, असे कोणाला वाटणार नाही? म्हणूनच योग्य ठिकाणी पैसे गुंतवून शक्य तितका जास्त परतावा मिळवण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे.
‘सकाळ’ माध्यम समूह आयोजित ‘सुहाना स्वास्थ्यम्’ उपक्रमामध्ये सेवानिवृत्तीनंतरचं जीवन चांगलं जगण्यासाठी आर्थिक नियोजन कसं करावं, या विषयावर विशेष भर देण्यात आला.
निवृत्तीनंतर असणाऱ्या संभाव्य आर्थिक गरजा, त्या गरजांच्या पूर्तीसाठी आर्थिक तरतूद कशी करावी, रूग्णालयात जावं लागलं आणि औषधोपचारासाठी मोठा खर्च करण्याची वेळ आली तर आपल्या गुंतवणुकीतून किंवा बचतीतून तो लगेच मिळाला पाहिजे. यासाठी काय केलं पाहिजे, याविषयी जाणून घेऊ या.
भारताची गेल्या ५० वर्षांमध्ये ज्या प्रकारे प्रगती झाली आहे, ती खूप विस्मयकारी आहे, असं म्हणता येईल. भारतामध्ये लोकशाही आहे, म्हणून देशाची प्रगती झाली, असेही अनेकजण म्हणतात.
हे काही प्रमाणात जरी खरं असलं तरी, या प्रगतीमध्ये अनेक गोष्टींचा वाटा आहे. भारताच्या विकासाचा विचार करताना काही अधोरेखित मुद्देही आहेत, ते आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजेत, असं आम्हाला वाटतं.

