Premium|Retirement planning :निवृत्तीचे अर्थपूर्ण नियोजन
Top Pension & Investment Schemes for Retirement in India
सुनील टाकळकर, ज्येष्ठ विमा सल्लागार
takalkars४९@gmail.com
निवृत्तीनंतरच्या आयुष्यात इच्छित जीवनशैली टिकवून ठेवण्यासाठी निवृत्तीचे अर्थपूर्ण नियोजन करणे आवश्यक आहे. निवृत्तीसाठी आर्थिक उद्दिष्टे निश्चित करण्याची आणि ती साध्य करण्यासाठी धोरण तयार करण्याची प्रक्रिया म्हणजे निवृत्ती नियोजन. त्याविषयी अधिक माहिती देणारा हा लेख...
‘जोतो वंदन करी उगवत्या, जो तो पाठ फिरवी मावळत्या’ ही जगाची रीत असली, तरी प्रत्येकाच्या आयुष्यात निवृत्ती अटळ आहे. निवृत्तीनंतर येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन निवृत्तीसाठी तयारी कशी करावी, यासाठी मॅक्स लाइफ इन्शुरन्स कंपनीने एक मोहीम एका जागतिक मार्केटिंग कंपनीच्या सहकार्याने हाती घेतली. ‘इंडिया रिटायरमेंट इंडेक्स स्टडी’ (चौथी आवृत्ती) या त्यांच्या निवृत्ती सर्वेक्षणावर सीएनबीसी या चॅनेलवर भारतातील अनुभवी आणि प्रथितयश तज्ज्ञ मंडळींनी चर्चा केली. या अभ्यासात भारतातील २८ शहरांत कार्यरत असलेल्या नोकरदारांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातील काही महत्त्वाची निरीक्षणे-
शहरी भारतीयांची वाढती संख्या निवृत्तीचे नियोजन लवकर सुरू करावे असे मानते. ४४ टक्के भारतीय निवृत्तीचे नियोजन सुरू करण्यासाठी ३५ वर्षे हे योग्य वय मानतात. ५० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ९३ टक्के प्रतिसादकर्त्यांना निवृत्तीचे नियोजन उशिरा केल्याबद्दल पश्चाताप झाला आहे.
६३ टक्के प्रतिसादकर्त्यांनी आधीच निवृत्तीसाठी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांना मूलभूत गरजांसाठी आणि जीवनशैली शानदार राखण्यासाठी कुठलीही चिंता उरलेली नाही. त्यांना मुलांचे भविष्य सुरक्षित करण्याचे टेन्शनदेखील राहिले नाही.