

Mutual Fund SIP Strategy
esakal
सई डिग्रजकर - sai_a8@rediffmail.com
जगात कुठेही युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली, की त्याचे पडसाद आर्थिक बाजारांवर लगेच उमटू लागतात. शेअर बाजार, सोने, कच्चे तेल आणि डॉलर यांमध्ये मोठी हालचाल दिसून येते. अशा वेळी सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या मनात एक प्रश्न हमखास निर्माण होतो, तो म्हणजे, युद्ध सुरू असताना म्युच्युअल फंडातील ‘सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ (एसआयपी)द्वारे गुंतवणूक सुरू ठेवावी... की बंद करावी?... याचे उत्तर देण्याचा हा प्रयत्न.
सध्या अमेरिका-इराण तणावामुळे पश्चिम आशियात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळेही जगभरात अनिश्चितता निर्माण झाली होती. युद्ध, जागतिक मंदी, दहशतवादी हल्ले, नैसर्गिक आपत्ती यांसारख्या घटनांनंतर शेअर बाजार, सोने, कच्चे तेल आणि डॉलर यामध्ये मोठी हालचाल दिसून येते. अशा वेळी सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या मनात एक प्रश्न हमखास निर्माण होतो, तो म्हणजे, ‘युद्ध सुरू असताना म्युच्युअल फंडातील ‘एसआयपी’ सुरू ठेवावी का बंद करावी?’ विशेषतः नव्या गुंतवणूकदारांसाठी बाजारातील घसरण मानसिकदृष्ट्या त्रासदायक ठरू शकते. दररोज पोर्टफोलिओ लाल रंगात दिसू लागला, की अस्वस्थ वाटणे स्वाभाविक आहे. मोबाइल उघडला, की नकारात्मक बातम्या, बाजारातील पडझड आणि तज्ज्ञांचे अंदाज, त्यामुळे गोंधळ आणखी वाढतो. खरे सांगायचे, तर अशा काळात ‘थोडे दिवस थांबूया का?’ हा विचार जवळपास प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनात एकदा तरी येतोच; पण इतिहासाकडे पाहिले तर, एक गोष्ट स्पष्ट दिसते... युद्धे, मंदी किंवा जागतिक संकटांमुळे बाजार हादरतात खरे; मात्र ते कायमचे थांबत नाहीत. काही काळानंतर अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येते आणि बाजारही सावरू लागतात. म्हणूनच अशा काळात घाबरून निर्णय घेण्यापेक्षा परिस्थिती समजून घेणे अधिक महत्त्वाचे ठरते.