अन्‌ अता, क्षितिजाच्या पल्याड निघूनी गेला...!

अन्‌ अता, क्षितिजाच्या पल्याड निघूनी गेला...!

इलाही यांच्या निधनाची बातमी समजली अन्‌ मन खचून गेलं. आपल्या जवळचा माणूस आता आपल्या सोबत नाही, ही जाणीव झाली आणि मन भरून आलं. आमची ३७ वर्षांची मैत्री. १९८३ मध्ये मी मुंबईला आलो तेव्हापासून दूरदर्शनला कार्यक्रम सुरू झाले होते आणि दूरदर्शनला मी गझलच गायचो. पुण्यामध्ये आम्ही सगळे एकदा एकत्र गेलो होतो आणि रात्रभर त्यादिवशी आम्ही गझलची मैफल भरवली होती. त्यावेळेस अनेक मोठे गझलकार त्या ठिकाणी होते. प्रत्येकजण अनेक गझल गाऊन दाखवत होते. गझलकार इलाही जमादार यांनी ‘अंदाज आरशाचा...’ ही गझल मला दिली, ती गझल मी मुंबईला घेऊन आलो. ही रचना किती चांगली आहे, याची कल्पना इलाहीला नसेल का, त्यांनी कदाचित फारसं लक्ष दिलं नसेल; पण मला ती गझल फार भावली होती. तिकडून आल्यावर मी लगेचच कामाला लागलो. आणि ही गझल मी कंपोज केली. मी माझ्या मैफलीची सुरवात मग याच गझलेने सुरुवात करायचो. मला अनेक जण विचारायचे की तुम्ही नेहमी मैफलीत ‘अंदाज आरशाचा...’ याच गझलेने सुरवात का करता? मी त्यांना सांगायचो की माणूस माणसासारखा वागत नाही, म्हणून आरसा त्याची मदत करतो. ज्या दिवशी माणूस माणसासारखा वागायला लागेल तेव्हा मी ही गझल गाणंदेखील बंद करेन.

इलाही यांच्या गझलमध्ये तंत्रशुद्धता तर असायचीच, पण वैयक्तिक दुःख, प्रेम, वेदना, सामाजिक भान या सर्वच गोष्टी यातून आपल्याला जाणवायच्या. त्यांचा दोन ओळींवरुण समोरच्या व्यक्तीला ते आपलेसे करायचे. अनेक प्रयोग इलाही यांनी मराठीमध्ये आणले. त्यांची एक आठवणीमधली गझल म्हणजे ‘ऐ सनम आखों को मेरी खूबसूरत साज दे, येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे’ यामध्ये दोन भाषा त्यांनी एकत्र केल्या आहेत. दुसऱ्या भाषेला धक्का न लागता त्यांनी आपली भाषा यामध्ये मिसळवून याला एका वेगळाच अंदाजामध्ये गायले. त्यांनी चित्रपटांची गाणीदेखील तेवढीच अप्रतिम लिहिली. कबिरांचे अनेक दोहेही त्यांनी गायले. 

नेहमीच आपल्या मस्तीत असणारा हा माणूस होता. नेहमी फक्त आपल्या आवडत्या कामामध्ये मग्न असायचा. त्याच्या अनेक गझल मी कंपोस केल्या. अनेक गझल गायलो. एक गझल त्यांनी मला दिली आणि मी ती कंपोस्स पण केली; पण मी ती गायलो नाही. का गायलो नाही, हे अजून माझ्या मनाला कळत नव्हतं. कदाचित एक वेगळी भीती असावी. त्या ओळी होत्या, ‘या क्षितिजाच्या पल्याड निघूनी जावे...’ म्हणून मला भीती होती की, खरंच कधीतरी हा बोलता बोलता निघून जाईल... आणि आज हा गेला! मला ही गझल फार आवडते पण मी ती गायलो नाही कधीच.

इलाही मुंबईला आल्यावर त्याचा नेहमीच माझ्या घरी मुक्काम असायचा. त्यावेळी आमच्या खुप गप्पा व्हायच्या. माझ्या बायकोला तो बहीण मानायचा आणि माझी मुलगी त्याला इली इली काका म्हणून हाक मारायची. 

लोक मला आतासुद्धा म्हणायची, की हा जास्त नेहमीच इलाहींच्या गझल गातो. नेहमीच सुरवात तो त्यांच्या गझलेने करतो. कदाचित इलाहीच्या बहिणीसोबत लग्न केल्यामुळे तो असं करत असणार, असं लोकांना वाटायचं. मुळात मी सगळ्यांच्या गझल गायचो. मी कधी फरक नाही केला. असं माझ्या कुटुंबातील भावासारखा एक व्यक्ती माझ्या आयुष्यातून दूर गेला. त्याची उणीव भरून निघणं फार कठीण आहे. एक वेगळंच व्यक्तिमत्त्व होतं इलाही, आम्हाला नेहमीच त्यांची आठवण येईल...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com