करिअर की जीवनशैली?

आजच्या तरुणांचं मात्र करिअरला प्राधान्य आहे.
career
careersakal

‘करिअर की लग्न?’ म्हणजेच पर्यायानं ‘करिअर की कुटुंब?’ हा आजच्या तरुणाईपुढचा सर्वांत महत्त्वाचा प्रश्‍न आहे. हा प्रश्‍न अर्थातच तरुण-तरुणी दोघांनाही आहे, पण मागील एका लेखात आपण हे पाहिलं की आजच्या बहुतांश तरुणींना ‘मातृत्वा’ची ओढ आहे. करिअर आणि मातृत्व यात समतोल कसा साधता येईल, या विषयी त्या काहीशा संभ्रमात असल्या तरी त्या मातृत्व नाकारीत नाहीत. साहजिकच त्यांना ‘लग्न’ हवं आहे, ‘कुटुंब’ हवं आहे. ‘फक्त करिअरसाठी लग्न नको’, हा निर्णय त्यांना एकांगी वाटतो.

आजच्या तरुणांचं मात्र करिअरला प्राधान्य आहे. जागतिकीकरण, नवनव्या संधी, बदलतं राहणीमान, वाढती स्पर्धा... अशा अनेक घटकांमुळे त्यांच्यासाठी सर्वांत महत्त्वाची ‘करिअर’च आहे. साहजिकच त्यांना भरपूर यश मिळवायचं आहे, ‘मजबूत’ पैसा कमवायचा आहे - तोही शक्‍य तितक्‍या कमीत कमी वेळात. त्यातूनच आज ‘वर्कोहोलिक’ तरुणांची संख्या वाढते आहे. अशा असंख्य तरुणांशी संवाद साधणाऱ्या, त्यांना समुपदेशन करणाऱ्या ज्येष्ठ मानसतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांचं या संदर्भातील निरीक्षण नक्कीच महत्त्वाचं आहे आणि तितकंच अस्वस्थ करणारंही! ते म्हणतात, ‘ही ‘करिअरिस्ट’ मंडळी प्रचंड महत्त्वाकांक्षी असतात, साहजिकच वर्कोहोलिकही.

सतत कामाचा विचार, करिअरची चिंता आणि अर्थातच न पेलणारा स्ट्रेस! यशामुळे त्यांना प्रतिष्ठा मिळत असते, पैशामुळे सुखसोयी मिळत असतात... पण तरीही ‘आनंद’ दूरच राहतो. त्यामुळेच त्यांना ‘आपण हे सगळं का करतोय’ असाही प्रश्‍न पडत असतो. अनेकदा जे कमावण्याचा अट्टहास आपण करतोय ते सारंच व्यर्थ आहे, असंही जाणवत असतं. पण हे मान्य न करता ही मंडळी पळवाटा शोधतात. त्यांना ‘ईझी प्लेअर्स’ म्हणता येईल. हे ‘ईझी प्लेअर्स’ सगळ्या सोप्या, इन्स्टंट गोष्टींच्या मागे लागतात. लग्न, कमिटमेंट हे त्यांना नकोसं असतं. त्यापेक्षा धडाधड अफेअर्स, ब्रेक-अप, फ्लर्टिंग, तासन्‌तास चॅटिंग, ड्रिंक्‍स, महागडं शॉपिंग असे तात्पुरते ‘रिलॅक्‍स’ होण्याचे मार्ग अवलंबिले जातात. आतून मात्र त्यांना अस्वस्थ, असुरक्षितच वाटत असतं. एकटेपण जाणवत असतं. ना आंतरिक संवाद... ना काही अर्थपूर्ण संबंध! इतकं यश मिळवूनही पदरी काय पडलं, हा प्रश्‍न त्यांना सतावीत राहतो.’

यंत्रयुगात माणूस यंत्रासारखंच काम करत होता. आता संगणक युगात तो संगणकासारखं काम करतोय... अथक. पण म्हणून त्यानं आयुष्यातला जिव्हाळा हरवून बसता कामा नये. हा जिव्हाळा देणारी नातीगोती जपायला हवीत. आपलं कुटुंब, मित्र यांचं आपल्या जीवनात काही खास स्थान असतं. ते तसंच राहायला हवं. त्यांच्याशी सतत शेअरिंग व्हायला हवं. ‘ग्लॅमरस’ क्षेत्रात झगमगतं यश मिळवणारे अनेक ‘सेलेब्रिटिज’ही हे आवर्जून सांगत असतात, ‘आयुष्यातला सर्वांत आनंदाचा काळ हा कुटुंबियांसमवेत मजेत घालवलेला असतो. बाहेरचे सगळे ताणतणाव त्यामुळेच विरून जातात.’

अवघ्या चाळीसाव्या वर्षी ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च बहुमान प्राप्त केलेला सचिन तेंडुलकर म्हणतो, ‘केवळ शतकं करणं, सामने जिंकणं किंवा भरपूर पैसे कमावणं यातच सगळं सुख आहे असं मला नक्कीच वाटत नाही. हे सगळं साजरं करायला आपली जवळची माणसं सोबत असणं, यातच खरा आनंद सामावलेला असतो. तरुणांना मी एवढंच सांगेन, भरपूर यश मिळवा, तुमची स्वप्नं साकार करा, पण ती करत असताना तुमच्यासाठी कुणीतरी त्याग करत असतं, तुम्हांला मनापासून साथ देत असतं, याचा विसर पडू देऊ नका! स्वतःच्या जीवनाची यशस्वी वाटचाल करताना आजूबाजूचे आनंदी कसे राहतील याचाही विचार करा.

कारण त्यातून मिळणारा आनंद आणि समाधान हेच खरं दीर्घकाळ टिकत असतं.’ पैसा तर हवाच असतो, पण पुस्तकं वाचणं, संगीत ऐकणं, पावसात भिजणं, गप्पा ठोकणं, मुलांशी दंगामस्ती करणं... हे छोटे छोटे आनंदच आपली जीवनशैली समृद्ध करीत असतात. खरा प्रश्‍न ‘करिअर की लग्न’ हा नाही, ‘करिअर की जीवनशैली’ हा आहे! ‘स्टॅन्डर्ड ऑफ लिव्हिंग’ की ‘स्टॅन्डर्ड ऑफ लाइफ’ हा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com