स्वामी विवेकानंद विचारस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते!

समाजातील विवेकावर स्वामी विवेकानंदांचा भर होता. युवकांकडून त्यांना अपेक्षा होत्या, असे विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी सांगितले.
dr dattaprasad dabholkar
dr dattaprasad dabholkarsakal
Summary

समाजातील विवेकावर स्वामी विवेकानंदांचा भर होता. युवकांकडून त्यांना अपेक्षा होत्या, असे विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी सांगितले.

समाजातील विवेकावर स्वामी विवेकानंदांचा भर होता. युवकांकडून त्यांना अपेक्षा होत्या, असे विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी सांगितले. विवेकानंद जयंती (ता.१२) राष्ट्रीय युवकदिन म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्ताने त्यांच्याशी झालेल्या संवादाचा अंश...

प्रश्न - आजच्या परिस्थितीत स्वामी विवेकानंदांची शिकवण कशी मार्गदर्शक ठरते?

डॉ. दाभोळकर - स्वामी विवेकानंदांची दोन पत्रे महत्त्वाची आहेत. मद्रासमधील आपल्या शिष्यांना २४ जानेवारी १८९४ आणि १९ नोव्हेंबर १८९४ या दोन दिवशी त्यांनी ही पत्रे पाठवली होती. त्यात ते नमूद करतात, की माणसाला जिवंत राहण्यासाठी फक्त हवा, पाणी आणि अन्न पुरेसे नसते, त्याला स्वातंत्र्य हवे असते. स्वातंत्र्य म्हणजे केवळ विचार आणि उच्चार स्वातंत्र्य नव्हे; तर प्रत्येक व्यक्तीने कोणता आहार घ्यावा, कोणते कपडे घालावीत आणि कोणाशी विवाह करावा, ही त्या व्यक्तीची वैयक्तिक बाब आहे. समाजाने त्यामध्ये ढवळाढवळ करू नये. विवेकानंदांनी धर्म, त्याचा उद्देश आणि त्याच्या पद्धती याबाबत स्पष्टपणे सांगितले होते, की एखादा धर्मग्रंथ किंवा एखादा फार मोठा साधू एखादी गोष्ट सांगत असेल आणि ती तुमच्या विचारशक्तीला पटत नसेल तर ती पूर्णपणे नाकारा. कारण परमेश्वराने माणसाला दिलेली सर्वात मोठी शक्ती ही विचार करण्याचीच आहे. ती वापरून धर्म ग्रंथातली गोष्ट नाकारली तर तुम्ही माणूस आहात म्हणून परमेश्वराला अधिक आनंद होईल. पण, ती तुमच्या विचारशक्तीला पटत नसताना धर्मग्रंथात आहे म्हणून स्वीकारली तर तुम्ही पशुच्या पातळीवर पोचला म्हणून परमेश्वराला वाईट वाटेल.

विवेकानंदांचे कोणते विचार आजच्या युवकांना अधिक उपयुक्त ठरतील?

- विवेकानंद बेलूर मठात एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिकाचे खंड मागवायचे. तेव्हा शिष्यांनी एवढे मोठे खंड वाचणार कसे, असा प्रश्‍न केला. त्यावर विवेकानंदांनी, हे ज्ञान जर तुमच्या जवळ नसेल तर घोकंपट्टी करून, केवळ धर्मग्रंथ वाचून तुमचा आजच्या जगात निभाव लागणार नाही. हे ज्ञान तुमच्या जवळ हवे. हे कसे वाचायचे, ते समजून घ्या. वाचताना आपले मन पूर्णपणे एकाग्र हवे. वाचावे कसे हे समजावून घ्या. लहान मूल एकेक अक्षर वाचते, नंतर शब्द आणि त्यानंतर एक ओळ एकत्र वाचते. तुम्ही प्रयत्न केला तर संपूर्ण परिच्छेदही एका नजरेत वाचू शकाल. ही प्रयत्नसाध्य कला आहे. तुमचे शरीर तुमच्या मनाच्या ताब्यात पाहिजे. त्यावर तुमचे नियंत्रण पाहिजे. मनाच्या शक्तीने जगातल्या सगळ्या गोष्टी साध्य करता येतात, ही विवेकानंदांची धारणा होती. युवकवर्गाकडून देशोद्धाराची त्यांना आशा होती.

समाजातील भेदभावाकडे विवेकानंद कसे पाहायचे?

- विवेकानंदांचे सर्वात महत्त्वाचे पत्र त्यांनी ऑगस्ट १८९५ मध्ये त्यांचे मित्र शशी यांना पाठवले होते. त्यात त्यांनी भेदाच्या भिंती पाडण्यावर भर दिला होता. त्यात ते म्हणतात, ‘एक गोष्ट लक्षात ठेव, रामकृष्ण जन्माला आले त्याचवेळी स्त्री-पुरुषांसह सर्व प्रकारचे भेदही संपले. सर्व एक समान आहेत. मी बुद्धदेवांनाही सर्वाधिक मानतो. कारण सर्वप्रथम त्यांनी सांगितले, की जातीभेद या देशातील अवनतीचे एकमेव कारण आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव वंशगट, कर्मगट, ज्ञानगट या सर्व जाती चुकीच्या आहेत. आपण समाजवादी आहोत.

सामाजिक एकात्मतेसाठी विवेकानंदांची शिकवण कितपत प्रभावी ठरेल?

- विवेकानंदांनी माणसाला माणूस बनवतो तो धर्म, असे सांगत तत्कालीन धर्मातील शोषणकारी रुढींवर प्रहार केले. दलितांना शंभर टक्के आरक्षण द्या. त्यांच्यासाठी दहापट अधिक चांगल्या शिक्षणाची सोय करा, असे त्यांनी आग्रहाने मांडले. या देशातील धर्मांतरे उच्चवर्णियांनी केलेल्या अत्याचारामुळे झाली आहेत. भारताला उन्नत करायचे असेल तर हिंदू-मुस्लिम यांचे सहकार्य नव्हे, समन्वय हवा. स्त्री-पुरुष यांच्यात पूर्णपणे समता हवी. सारी माणसं एक आहेत. धर्म, जात, पंथ, लिंग या बेड्या तोडा, अशी त्यांची शिकवण होती.

विवेकानंदांचे कार्य पुस्तकरुपाने मांडण्यामागील तुमची भूमिका काय होती?

- विवेकानंदांची आजपर्यंत करुन देण्यात आलेली ओळख अपुरी, एकांगी, चुकीची किंवा विकृत आहे. दहा वर्षांपूर्वी ‘शोध स्वामी विवेकानंदांचा’ हे माझे पुस्तक प्रकाशीत झाले. गेली दहा वर्षे राज्यभर दर महिन्याला विवेकानंद समजून देण्यासाठी राज्यभर मी भाषणे देत होतो. माझी मांडणी सगळ्यांनाच रुचायची नाही, त्यामुळे काही लोक माझे भाषण होऊ नये म्हणून प्रयत्न करायचे. ‘शोध स्वामी विवेकानंदांचा’ हे पुस्तक पीएचडीचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी आपण जो सारांश सादर करतो, अशा स्वरुपाचे आहे. ‘स्वामी विवेकानंदांची खरी ओळख’ हे पुस्तक तो अभ्यास पूर्ण झाल्यावर संपूर्ण संदर्भ देऊन जो प्रबंध सादर केला जातो, तशा स्वरुपाचे परिपूर्ण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com