रंगी रंगला.. कालिदास !

कालिदासाच्या साहित्यकृतीतील रंगांची किमया एकमेवाद्वितीय आहे. त्यातील रंग मोहिनी घालतात.
Kalidas
KalidasSakal
Summary

कालिदासाच्या साहित्यकृतीतील रंगांची किमया एकमेवाद्वितीय आहे. त्यातील रंग मोहिनी घालतात.

- डॉ. पंकज भांबुरकर

कालिदासाच्या साहित्यकृतीतील रंगांची किमया एकमेवाद्वितीय आहे. त्यातील रंग मोहिनी घालतात. वर्णिलेल्या रंगछटा भूल पाडतात. रंगतरंग उठवतात. महाकवी कालिदास दिनानिमित्त (ता.३० जून) विशेष लेख.

निसर्गातील रंगांच्या विविध छटा कलादृष्टीने हेरून, त्यांच्यातील भावसौंदर्य आत्मसात करून वाचकांना त्याची प्रचिती देणाऱ्या चित्रकलामर्मज्ञ कालिदासाला तेजाचे खूप आकर्षण असल्याचे त्याच्या काव्य-नाटकातील सर्गवार उल्लेखांवरून दिसते. सर्व प्रकारच्या प्रकाशाची त्याच्या मनावर विलक्षण मोहिनी आहे. स्वाभाविकच ज्यांच्यापासून मानवाला तेजाची प्राप्ती होते, त्या सूर्य, चंद्र, नक्षत्रादी आकाशस्थ तेजोगोल यांचा उल्लेख त्याने पुनरुक्तीचा दोष पत्करूनही केला आहे. सृष्टीत जिथे प्रकाश आहे, तिथे तिथे कालिदासाची चित्तवृत्ती गुंतली आहे. या आकर्षणातून त्याच्या प्रकाशविषयक अनेक उपमा जन्मल्या आहेत.

दृश्यकलेत प्रकाशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रकाशामुळे सृष्टीतील वस्तूंचे आकार व रंग गोचर होतात. बालकवींसारख्या आधुनिक रोमँटिक कवीच्या ठायी रंगांची व त्यांतील सूक्ष्म छटांची जशी अनिवार आसक्ती दिसते, तशी कालिदासाच्याही ठिकाणी दिसते. स्पेन्सर व किट्स हे कवी दृश्यामधील रंगांच्या गहिऱ्या छटा हेरून काढून त्यांचे तितकेच गहिरे वर्णन करतात. रोमँटिक कवींच्या ठिकाणी ती आसक्ती आढळते. ज्यांच्या बाबतीत ती टोकाला गेलेली असते, अशांना इंग्रजीत ‘कलर माइंडेड क्रोमेस्थेटिकल’ म्हणतात. अशांना लोकांना संगीतातील सूर ऐकताच काहीतरी रंग भासत असल्यासारखे वाटते. सामान्य लोकांच्या दृष्टीने हे चमत्कारिक, असंभाव्य आहे, परंतु ज्यांची मने संवेदनशील असतात, अशा कवींच्या बाबतीत हे शक्य आहे. कालिदास संगीतज्ञ होता.

संगीत व चित्रकला या दोन्हींच्या कक्षा जिथं एकमेकांना स्पर्श करतात त्या दृक् संकल्पनेला जन्म देणारा `सायनेस्थेशिया’ या प्रकाराने कालिदासाला प्रेरणा दिली असावी. व्हॅन गॉग, कँडिनस्की, मोंद्रियान यासारख्या चित्रकारांना, स्क्रियाबीन, मेसियन, लिगेती यासारख्या रचनाकारांना, बॉदलेअर, नबोकाव या कादंबरीकारांना जसा तो प्रेरणास्त्रोत ठरला, तसाच कालिदासालाही ठरला असावा.. १९ व्या शतकाच्या मध्यात बाळसं धरलेली ही मानसशास्त्राधिष्ठित संकल्पना असली, तरी ज्या सर्जकांना संगीत आणि चित्रकला या दोन्ही कलेत गती आहे, त्यांना नवनिर्मितीसाठी ऊर्जास्त्रोत पुरवणारी ठरते. कालिदासाचे चित्रकलेचे ज्ञान व संगीताविषयी त्याने काव्य-नाटकात केलेल्या उल्लेखांशी ही संकल्पना साधर्म्य राखते. बाणभट्ट, स्पेन्सर, बालकवी यांच्याप्रमाणेच कालिदासाच्या ठिकाणीही रोमँटिक कवीला साजून दिसेल, अशी रंगांची अनिवार आसक्ती दिसून येते. त्याच्या काव्य नाटकात कथानक रंगवीत असताना किंवा स्वतंत्रपणेही निसर्गाची जी चित्रदर्शी वर्णने आहेत, त्यात त्याने रंगांची अनिवार आसक्ती पूर्ण करून घेतली आहे.

चित्रदर्शी वर्णन

मेघदूतात, यक्ष मेघाला प्रवासादरम्यान लागणारे विविध पर्वत, नद्या इत्यादींची माहिती देताना विंध्य पर्वताच्या पायथ्याशी खडकाळ प्रांतातून वाहणाऱ्या नर्मदेचं चित्रदर्शी वर्णन करतो. नर्मदा वर्णनाच्या ह्या श्लोकापूर्वी आम्रकूट पर्वताचं वर्णन करणाऱ्या श्लोकातही विशिष्ट रंगांकडे निर्देश आहे. दोन्ही श्लोकातील स्थाने भौगोलिकदृष्ट्या वेगळी असली तरी त्यांच्याकडे पाहण्याचा कोन महत्त्वाचा. दोन्ही स्थळांचं कालिदासाचं विहंगावलोकन चित्रकाराच्या तोलामोलाचे आहे. पर्वताचा विस्तृत भाग कवीला जणू हत्तीचं काळं शरीर वाटलं आणि प्रवाह पुष्कळ ठिकाणी फाटल्यामुळे अस्ताव्यस्त वाहणारी शुभ्र फेसाळ नर्मदा हत्तीच्या शरीरावर पांढऱ्या रंगाने चित्रकारी (वेलबुट्टी) काढावी अशी वाटली. पिकलेल्या आम्रफळांमुळे ज्याच्या सर्व बाजू झाकून गेल्या आहेत, अशा आम्रकूट पर्वतशिखरावर आरुढ झाल्यामुळे पर्वताला पृथ्वीच्या स्तनाचं सादृश्य प्राप्त झालं, असं वर्णन आहे. एकीकडे काळा-पांढरा तर दुसरीकडे पिवळा- काळा असा रंगसंकेत दिसतो.

रघुवंशात, पुष्पक-विमानातून दिसलेल्या प्रयागाजवळील गंगा-यमुना संगमाचे वर्णन रघुकाराने पुढीलप्रमाणे केले आहे - गंगेच्या शुभ्र प्रवाहात यमुनेचे कृष्णवर्ण उदक मिळाल्यामुळे तो कृष्णसर्पाने वेष्टित अशा शंकराच्या शुभ्र तनुसारखा दिसत होता.

मालविकाग्निमित्रात, चित्रकलाचार्यांनी काढलेल्या ज्या समूहचित्राचं अवलोकन राणी धारिणी करीत आहे, त्यातील रंग ताजे, ओले असल्याचं कालिदास नमूद करतो. याचा अर्थ असा असू शकेल, की चित्र पूर्ण होते न होते तोच त्याच्या दर्शनाची अभिलाषा बाळगत लगबगीने चित्रशाळेत पोहोचणारी धारणी रसिका होती. कदाचित चित्रकलाचार्यांनीही आपल्या अपेक्षेप्रमाणे चित्र पूर्ण झाले आहे ना, असा राणीचा अभिप्राय घेण्यासाठी तिला पाचारण केले असावे. जेणेकरून चित्रातील रंग ओले असताना त्यात काही बदल अपेक्षित असतील तर चित्रकाराला त्वरित करता यावेत. चित्रातील रंग वाळले, की त्यात बदल करणे दुरापस्त होत असावे! ते ओले असतानाच राजाही ते चित्र बघतो, त्यामुळे चित्रातील मानवाकृतींच्या शरीरकांतीचा तजेलदारपणा उठावदार दिसत असावा. ओल्या रंगांचा उल्लेख केल्यामुळे अनेक अर्थतरंग उमटतात. कुमारसंभवातही चित्रातील रंग भरण्याचे महत्त्व त्याने अधोरेखित केलं आहे. ‘रेखाटलेले चित्र जसे कुंचल्याने रंग भरताना उमलत जावे, तसे पार्वतीचे अंग प्रत्यंग विकसित होत होते.’ कागदावर रेखाटलेले विविध आकार रंग लेपनानंतर हळूहळू त्रिमित रूपात कसे बदलत जातात, त्याची प्रक्रिया कालिदासाने जवळून अनुभवली असावी. म्हणूनच सूर्यकिरणांनी कमलपुष्प विकसित व्हावे, अशी उपमा देण्याअगोदर त्याने ‘उन्मीलितं तुलीकयेव..’ म्हणत चित्राची उपमा प्रथम देणे पसंत केले.

भावविभोर अवस्था

केवळ रेखांकन म्हणजे संपूर्ण चित्र नव्हे, तर त्यात रंग भरल्यानंतरच ते ‘चित्र’ संज्ञेस पात्र ठरतं, असं त्याला सुचवावंसं वाटलं असावं.. ‘अभिज्ञानशाकुंतल’ नाटकातही, दुष्यंत राजाने शकुंतलेचे काढलेले स्मरणचित्र अपूर्ण असल्याचा उल्लेख असून त्याची पार्श्वभूमी अद्यपि रंगवायची राहून गेल्याचे दुष्यंत विदूषकास सांगतो. दुष्यंताचा अश्रू बिंदू ओघळून चित्रातील शकुंतलेच्या गालावर पडल्यामुळे तिच्या गालावरील रंग वर आल्याचाही उल्लेख आहे. चित्रात रंगलेपन करताना दुष्यंताची भावविभोर अवस्था या वर्णनातून स्पष्ट होते.

चित्रकलेत छाया-प्रकाशाला महत्त्व आहे. शुभ्रतेचे वर्णन करण्याचा जिथे जिथे प्रसंग आला, तिथे तिथे निसर्गातील विशिष्ट पदार्थांशी त्याची सांगड घालून कालिदासाने एकाच शुभ्र वर्णातील छटा उत्कृष्टपणे प्रकट केल्या आहेत. त्याच्या साहित्यकृतीतील रंग मोहिनी घालतात. वर्णिलेल्या रंगछटा भूल पाडतात. रंगतरंग उठवतात. रंगांचं अंतरंग कालिदासाला चांगलं उमजलं होतं. रंगांचा एकजिनसीपणा आणि त्यांच्या विविध छटा, एकीकडे विशिष्ट रंगांतून अभिव्यक्त होणारा क्रोध आणि दुसरीकडे दुसऱ्याच रंगातून जाणवणारी मृदुता, कधी आक्रस्ताळेपणा तर कधी सावध स्तब्धता, कधी अगदी उतावीळ तर कधी घनगंभीरता, कधी नुसता विदुषी थाट तर कधी वैराग्य तटस्थता. रंगांचा हा मायावी खेळ, रंगांची ही अनंत रूपे जशी प्रकाशातून स्त्रवतात, तशीच ती कालिदासाच्या साहित्यातही जन्म घेतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com