पहाटपावलं : खारीचा वाटा

Shrikant-Chorghade
Shrikant-Chorghade

गझलगायक जगजितसिंगच्या  ओळीं आठवत आहेत.
बरसातका बादल तो दिवाना है, क्‍या जाने किस राहसे बचना है, किस छत को भिगोना है.

या पावसाळी ढगांचं वेडेपण यंदा प्रकर्षाने जाणवतं आहे. आम्ही नागपूरकर संततधारांची वाट बघतो आहोत; पण नागपूर, विदर्भ व मराठवाडा या टापूमध्ये पावसाने संप पुकारला आहे. दुसरीकडे पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, केरळ, कर्नाटक, बिहारमध्ये ढगांनी घागरीच्या घागरी ओतल्या. टीव्हीवर पावसाच्या अवकृपेची दृश्‍यं बघून अंगावर काटा उभा राहिला. अतिवृष्टीने कित्येक गावांना तलावांचं स्वरूप आलं. लहान मुलं, माणसं पुरात अडकली नि रस्ते पाण्याखाली गेले. मोकळ्या असलेल्या महामार्गावर मैलोगणती वाहनांच्या रांगा लागल्या. पिकं बुडाली. घरं जमीनदोस्त झाल्यामुळे हजारो लोकांच्या डोक्‍यावरचं छप्पर गेलं. गुरंढोरं, कोंबड्या, बकऱ्या सगळं पुरात वाहून गेलं. अशा प्रसंगी पुरात अडकलेल्यांना सुरक्षितस्थळी पोचवण्यासाठी हजारो हात पुढे आले. शासकीय यंत्रणा, पोलिस दल, लष्कर, हवाई दल, नौदल, ‘एनडीआरएफ’, सेवाभावी संघटना अशा अनेकांनी युद्धपातळीवर काम करून पूरग्रस्तांना मोठा दिलासा दिला. हे आधुनिक युगातील देवदूतच म्हणायला हवेत. स्वतःच्या जिवाची पर्वा न करता जवानांनी काम केलं.

गावागावांतील तरुणही मदतीला धावून आले. अन्नाची पाकिटं, पाण्याच्या बाटल्या गोळा करून त्या तहानल्या, भुकेजल्या जनतेपर्यंत पोचवायला ते झटत आहेत. पूरग्रस्तांना मदत पोचवितानाच अनेकांनी जिवावर उदार होऊन पुरात अडकलेल्यांचे जीव वाचवले. पूरग्रस्तांची नावं माहीत नाहीत आणि अशा तारणकर्त्यांचीही नावं माहीत नाहीत. पाऊस ओसरतो आहे, तसंतसं त्याने केलेल्या बरबादीचं भीषण चित्र पुढे येत आहे. पूरग्रस्तांच्या मदतीला स्वयंसेवी संस्था धावून येताहेत. काही मंदिरांच्या वतीने मदत पाठवली जात आहे.

कोल्हापूरमध्ये यंदा बकरी ईद साजरी करताना मुस्लिम बांधवांनी बकऱ्याची कुर्बानी न देता तोच पैसा पूरग्रस्तांसाठी दिला. तसेच, मशिदींमध्ये अन्नछत्रे उघडली. परिस्थितीचं गांभार्य लक्षात घेता ज्या भागात पूरस्थिती नाही, तेथील लोकांनी आपल्यापरीनं जसं जमेल तसं या मदतकार्यात भाग घ्यायला हवा. हे मदतकार्य म्हणजे जगन्नाथाचा रथ ओढण्यासारखं कठीण काम आहे. जितकी माणसं जोडली जातील, तितकी कमी पडतील अशी परिस्थिती आहे. येता काही काळ सणवार, उपासतापास पाळण्याचा आहे. त्या निमित्ताने मदतकार्याला पुण्याचं काम समजून, जमेल तेवढं योगदान प्रत्येकाकडून केलं गेलं, तर या महासंकटात अडकलेल्या जनतेपर्यंत मदत पोचून त्यांच्या पुनर्वसनाच्या कार्याला नक्की हातभार लागेल. प्रत्येकाने आपापल्या क्रयशक्तीप्रमाणे खारीचा वाटा उचलला, तर या महासंकटाचं निवारण शक्‍य होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com