इथे चेंगरल्या श्रद्धा
अग्रलेख
गर्दीचे सर्व जागतिक उच्चांक मोडणारा प्रयागराजचा महाकुंभ आणि जगातील सर्वात वेगवान घोडदौड करणारी अर्थव्यवस्था अशा दोन दाव्यांमुळे भारत सध्या जगाचे लक्ष वेधून घेत आहे. भारताच्या धार्मिक आणि आर्थिक सामर्थ्याची झलक दाखवणाऱ्या या दोन गोष्टी आहेत. परंतु महाकुंभाची आणि अर्थव्यवस्थेची ही समांतर वाटचाल निर्वेध आणि निर्धोक ठरताना दिसत नाही. दोन्हींना ‘चेंगराचेंगरी’ने ग्रासले आहे. १४४ वर्षांनंतर भरणाऱ्या महाकुंभाची अपूर्व पर्वणी साधून मनःशांतीसह कल्याणाची कामना करीत आस्थेची डुबकी घेण्यासाठी अधीर झालेले आणि भारतीय अर्थव्यवस्थेत अभूतपूर्व तेजी येण्याच्या कल्पनेने मोहरुन तितक्याच आस्थेने शेअर बाजारात गुंतवणूक करणारे हे दोन्ही श्रद्धाळू सध्या चर्चेचा केंद्रबिंदू झाले आहेत. महाकुंभाच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीत गरीब आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय; तर शेअर बाजारातील चेंगराचेंगरीत विकसित भारताचे स्वप्न पाहात दर महिन्याला ‘एसआयपी’ करणारा मध्यमवर्ग भरडून निघतो आहे.
वर्षानुवर्षे भरणाऱ्या कुंभमेळ्यातील गर्दीच्या व्यवस्थापनाला लागलेली एखाद्या अफवेची टाचणी जशी चेंगराचेंगरीसाठी कारणीभूत ठरते, तशीच अफवा शेअर बाजाराच्या तेजी किंवा मंदीसाठीही कारणीभूत ठरत असते. दोन्ही ठिकाणी श्रद्धाळूंना त्यांची भाबडी आस्था चुंबकाप्रमाणे खेचून नेण्याचे काम करीत असते.या दोन्ही बाबतीत माध्यमे आणि समाजमाध्यमे यांचा उत्साह उतू चालला आहे. भारतात सध्या दुसरे काहीही चाललेले नाही, असे भासवत सर्व राष्ट्रीय, विशेषतः हिंदी वृत्तवाहिन्यांनी महाकुंभाभोवती असे काही वलय निर्माण केले की त्यात गर्भश्रीमंतापासून अतिसामान्यापर्यंत सारेच गुरफटले गेले. यंदाच्या महाकुंभामध्ये गर्दीचे सर्व विक्रम इतिहासजमा करणाऱ्या ४५ कोटी भाविकांच्या गंगास्नानाचा अपेक्षित उच्चांक महाकुंभ संपण्याच्या दहा दिवस आधीच गाठल्याचा नवा दावा केला जात आहे.

