

Bangladesh T20 World Cup exit
sakal
अग्रलेख
भारतीयांसाठी क्रिकेट हा केवळ एक खेळ नाही, तर तो धर्म आहे. याच धर्माने अठरा वर्षांपूर्वी आयपीएल ‘टी-२०’ लीग हा नवा संप्रदाय जन्माला घातला. ललित मोदीनामक थोर, व्यवहारी क्रीडापुरुष त्याचा जन्मदाता. ‘टी-२०’च्या आगमनामुळे क्रिकेटला वेग मिळाला. इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (आयसीसी) आणि ‘बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया’ (बीसीसीआय)सारख्या क्रीडा संस्था गब्बर झाल्या. वीस षटकांच्या या खेळाने मैदानावर नवी अर्थक्रांती घडविली. क्रीडा संघटनांप्रमाणेच खेळाडू, सामन्यांचे प्रसारण हक्क विकत घेणाऱ्या कंपन्यांपासून ते चीअर लीडरपर्यंत सगळे मालामाल झाले. क्रिकेटच्या मैदानावर पैशांचा पाऊस पडला. चेंडू-फळीच्या खेळाला नवे ग्लॅमर मिळाले. याच झटपट क्रिकेटचे चाहते वाढले; पण त्यातील नजाकत लोप पावली.