शहरे, महानगरे, लगतची उपनगरे येथील प्रश्न गुंतागुंतीचे आणि तीव्रही बनत चालले आहेत. अशा ठिकाणी नगरनियोजन, व्यवस्थापन कमालीचे आव्हानात्मक बनलेले असताना त्याकडे लक्ष देण्याऐवजी नवे वाद उकरून काढले जात आहेत..अगदी काही महिन्यांपूर्वी सामान्यज्ञानाच्या परीक्षेत ‘कॉँग्रेस पक्षाचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष कोण’, असा प्रश्न विचारला गेला असता, तर तो अनेकांना नक्कीच कठीण गेला असता. आपल्या नावाची चर्चा होत नाही, प्रसारमाध्यमांत नाव झळकत नाही, ही बाब राजकारणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीसाठी कमालीची अस्वस्थ करणारी आहे, यात शंका नाही.अशाप्रकारे अस्वस्थ होऊन आपले नाव सर्वदूर पोचावे म्हणून प्रयत्न करण्यात काहीच गैर वा आक्षेपार्ह नाही. प्रश्न फक्त त्यासाठीच्या मार्गाचा आहे. कॉँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यासाठी जो मार्ग स्वीकारला, तो त्यांनाच नव्हे तर पक्षासाठीही घातक आहे, असे सांगणे भाग आहे..मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौरांनी आपल्या कार्यालयाच्या भिंतीवर टिपू सुलतानची प्रतिमा लावल्याने प्रचंड गदारोळ झाला. मग त्यांच्या समर्थनासाठी सपकाळ सरसावले. टिपू सुलतानची प्रतिमा लावण्यात गैर काय, असा प्रश्न उपस्थित करूनच ते थांबले नाहीत, तर टिपूची तुलना त्यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. त्यांचे वक्तव्य अत्यंत वेदनादायक आहे.आपल्या इतिहासातील मानबिंदू कोणते, त्यांचे कर्तृत्व आणि त्यामागील प्रेरणा काय, या कशाचा थांगपत्ता नसेल तरच असे वक्तव्य केले जाऊ शकते. माहीत असूनही जाणूनबुजून मतपेढीवर डोळा ठेवून हे केले असेल, तर आपल्या राजकारणाचे अधःपतन किती झपाट्याने होत आहे, याचाच तो पुरावा आहे. टिपू सुलतानचे गौरवीकरण राजकीय कारणासाठी करणे ही नवी बाब नाही..कर्नाटकात कॉंग्रेसने त्याची जयंती साजरी करण्याचा घाट घातला होता. त्यावरून प्रचंड वादंग माजले होते. त्या राज्यात कॉँग्रेस व भाजपने या प्रश्नावरून ध्रुवीकरणाचे राजकारण केले होते. आपल्या राजकीय हेतूंसाठी इतिहासाला वेठीस धरण्याचे प्रकार ठिकठिकाणी होत असतात. अशा विपर्यासाच्या ‘इतिहासा’ची आपल्याकडे कधीच उणीव नव्हती.परंतु आजपर्यंत टिपू सुलतानाची शिवाजी महाराजांशी तुलना करण्याचा आचरटपणा कोणी केला नव्हता. प्रदेशाध्यक्षांच्या या असल्या वक्तव्याचे संतप्त पडसाद उमटल्यानंतर चार दिवसांनी का होईना त्यांनी माफी मागितली, ही त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब. निदान आतातरी या विशिष्ट प्रकरणावर पडदा पडेल, अशी अपेक्षा आहे..खरे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आस्थापना, कार्यालये येथे कोणाच्या प्रतिमा लावाव्यात, याविषयीच्या नियमांचे नगरविकास खात्याचे परिपत्रक आहे. त्यातील नियमांचे पालन झाले नाही, हा मूळ मुद्दा. तो तेवढ्यापुरता सीमित ठेवून हा प्रश्न निकालात काढता आला असता. पण तसे झाले नाही. सपकाळ यांच्या विधानामुळे मग अशा विषयांना हवा देऊन राजकारण साधणाऱ्यांचे चांगलेच फावले.जिभा सैल सुटल्या. इतक्या की सपकाळ यांची जीभ कापण्याची आणि त्यासाठी बक्षीस जाहीर करण्यापर्यंत भाजपच्या एका आमदाराची मजल गेली. पुण्यात कॉंग्रेसभवनाच्या समोर निषेधाचे आंदोलन केले गेले..भाजपची मंडळी या मुद्यावर नाकाने कांदे सोलत असली तरी या पक्षाच्या नगरसेवकांनीही वेगवेगळ्या शहरांतील रस्त्यांना किंवा चौकांना टिपू सुलतानाचे नाव दिले आहे, किंवा तसे ते देण्याची शिफारस केली आहे, असे सांगून कॉँग्रेसच्या प्रवक्त्याने भाजपला प्रत्युत्तर दिले. तसे करणाऱ्यांच्या नावाची जंत्रीच त्यांनी पत्रकारपरिषदेत सादर केली.विषय एवढा पेटला आहे म्हटल्यावर ‘शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे’ यांसारखा पक्ष त्यापासून दूर राहणे शक्यच नव्हते. त्या पक्षाच्या नेत्याने हा विषय थेट पाकिस्तानपर्यंत नेऊन भिडवला. ‘टिपूचा उदोउदो करणाऱ्या पाकिस्तानशी भारत क्रिकेट सामना कशाला खेळला, तो रद्द का केला नाही’, असे त्यांनी विचारले..थोडक्यात अशा विषयांवरून राजकीय रण माजवण्यात कोणीच मागे राहायला तयार नाही. इतिहास काय आहे, हे वाचण्याची, तो समजून घेण्याची तसदी घेण्याचीही त्यांची तयारी नाही. आपल्या वक्तव्यांमुळे सामाजिक स्वास्थ्याला तडा गेला तरी त्याची कोणाला फिकीर नाही. खरे तर वाढत्या शहरीकरणाने शहरे, महानगरे, लगतची उपनगरे येथील प्रश्न गुंतागुंतीचे आणि तीव्रही बनत चालले आहेत..अशा ठिकाणी नगरनियोजन आणि व्यवस्थापन कमालीचे आव्हानात्मक बनलेले असताना त्याकडे लक्ष देण्याऐवजी नवे वाद उकरून काढले जात आहेत. एरवी निवडणुकांच्या तोंडावर असे राजकारण करणे नित्याचेच झाले आहे. पण निवडणुका होऊन गेल्यानंतरही असे विषय तापवले जाणे, ध्रुवीकरणाला धार लावणे ही चिंतेचीच बाब आहे. अशा रीतीने मूळ प्रश्नांना बगल दिली जाणे, हे सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर पडते, हे वेगळे सांगायला नको..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.