
आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत सातत्याने आग्रही आणि ठोस भूमिका घेत आहे, याचे प्रत्यंतर अलीकडे वारंवार येते. विशेषतः परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर वेगवेगळ्या मुलाखती, भाषणे यामधून जी मांडणी करतात, तीत हा आत्मविश्वास प्रकट होतो. त्यांच्या ताज्या वक्तव्याचे उदाहरण नोंद घ्यावी असे आहे. ‘‘अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शविल्यामुळे काश्मीरचा प्रश्न कधी सुटणार’’ अशा प्रश्नाचा यॉर्कर लंडनमधील ‘चॅथम हाऊस’ या थिंक टँकने आयोजित केलेल्या चर्चेत पाकिस्तानच्या एका पत्रकाराने विचारला. त्यावर अजिबात विचलित न होता डॉ. जयशंकर म्हणाले, ‘‘ पाकिस्तानच्या ताब्यात असलेला काश्मीरचा चोरलेला भाग परत मिळाला की काश्मीरची समस्या पूर्णपणे सुटेल’’.