

Maharashtra Sahitya Parishad election
sakal
लोकशाही ही केवळ राजकीय प्रणाली नव्हे, तर ती जीवनपद्धती आहे, ही उक्ती अधूनमधून भाषणांमधून पेरण्यापुरती राहिली आहे का, असा प्रश्न पडावा, अशी स्थिती आपल्याकडे निर्माण झाली आहे. ती जर खरोखरच जीवनपद्धती असती, तर तिच्या गाभ्याशी असलेल्या उदारमतवाद, सहिष्णुता अशा मूल्यांची प्रचीती आपल्या सार्वजनिक जीवनात आली असती. साहित्य, कला हे प्रांत आपल्या स्वाभाविक प्रकृतीनुसार, शैलीनुसार बहरले असते. राजकीय सत्तेच्या राजकारणाची छाया त्यावर पडली नसती. पण आपल्याकडचे चित्र तसे दिसत नाही. उलट ही क्षेत्रे आता कमालीची राजकारणग्रस्त होताहेत. दोन प्रकारे ही प्रक्रिया सध्या दिसते. मुरलेल्या राजकारण्यांनीही तोंडात बोटे घालावीत, असे डावपेच साहित्यसंस्थांत वावरणारी तालेवार मंडळी खेळताना दिसतात. दुसऱ्या बाजूला या संस्थांचा ताबा आपल्या ‘विचारां’च्या गटाकडे असला पाहिजे, असे मानून ‘सदस्यसंख्येची लढाई’ लढवली जात आहे.