
‘है प्रीत यहां की रीत सदा..’ ही गायक महेंद्र कपूरच्या बुलंद आवाजातली लकेर सिनेमागृहात घुमली की खुर्ची-खुर्चीतला प्रेक्षक उठून उभा राहायचा. पुढ्यातल्या भव्य रुपेरी पडद्यावरचा पाठमोरा नायक ‘भारत की बात’ सुनावू लागला की अंगात देशप्रेमाच्या लहरी उसळत. बघावे तेव्हा कोनात वळलेला चेहरा, हनुवटी किंवा गालावर बोट, जणू आपला देखणा चेहरा त्याला दाखवायची इच्छाच नाही. डोळ्यात काहीसे दुखरे भाव आणि त्या भावातही फारसा बदल संभवतच नाही. तरीही या अभिनेत्याचे नाव अग्रणी सिताऱ्यांमध्ये कायम समाविष्ट असे. देव आनंद, राज कपूर, दिलीपकुमार, राजेंद्रकुमार, राजकुमार, शम्मी कपूर, राजेश खन्ना अशा तगड्या सिताऱ्यांच्या भाऊगर्दीत हरिकृष्ण गिरी गोस्वामी ऊर्फ मनोजकुमार हा तारा आपले आपले नक्षत्रांचे देणे घेऊन अढळपणे उभा राहिला. ‘ऐसी जगह बैठिये, कोई न बोले उठ, ऐसी बोली बोलिए, कोई न बोले झूठ’ हा संत कबिराचा सांगावा त्याने बहुधा आंगोपांगी बाणवला असावा. इतर सिताऱ्यांसारखा तो तळपणारा कधीच नव्हता. बेजोड अभिनयाचे वरदानही त्याला कदाचित लाभले नव्हते.